आता प्रांत ऐवजी विभाग प्रचारक ! संघाच्या प्रचारक रचनेत बदल, कार्यपद्धती मात्र कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 12:47 IST2026-03-20T12:46:59+5:302026-03-20T12:47:33+5:30
Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत बदलांना मान्यता मिळाली असून आता प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक राहणार आहेत. हरयाणातील समालखा येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गुरुवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी याबाबत नागपुरात माहिती दिली.

Now instead of provincial, there are divisional campaigners! Changes in the campaigning structure of the Sangh, but the working method remains the same
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत बदलांना मान्यता मिळाली असून आता प्रांताऐवजी विभागनिहाय प्रचारक राहणार आहेत. हरयाणातील समालखा येथील अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर गुरुवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी याबाबत नागपुरात माहिती दिली. संघकार्य वाढत असल्याने संघाच्या प्रचारक रचनेत बदल करण्यात आला आहे. मात्र संघाची कार्यपद्धती आतापर्यंत होती तशीच राहणार असल्याची त्यांनी स्पष्टोक्ती केली. नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
शंभर वर्षाच्या कार्यकाळात संघाचे काम मोठे झाले आहे. त्यामुळे रचना विकेंद्रित होणे आवश्यक झाले. अनेकदा कामादरम्यान शासन-प्रशासनाशी संबंध येतो. त्यासाठी वेगळी व्यवस्था हवी या विचारातून प्रांताऐवजी आता विभागाची रचना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार आता ८६ विभागांना वेगळे प्रचारक राहणार आहेत. तसेच राज्य पातळीवरदेखील प्रचारक राहतील.
अनुकूलता हे एक मोठे आव्हानच असते व पतनाची सुरुवात अनुकूलतेतूनच होते. अजून संघाचा स्वयंसेवक प्रसिद्धी अनुरूप झाला असे नाही. तो होऊ नये याचे प्रयत्नदेखील सुरू झाले आहेत. अनुकूलतेत कसे काम करावे हा विषय बौद्धिक वर्गात असतो. स्वयंसेवकांना अनुकूलतेची बाधा होऊ नये यावर विचार सुरू असतो व तसे प्रयत्न दिसून येतात, असे सरसंघचालकांनी स्पष्ट केले.
काही कम्युनिस्टांनाही आता संघ चांगला वाटू लागला
संघ केवळ कार्यकर्त्यांचा जिव्हाळा व प्रेमातून वाढत आला आहे. स्वयंसेवकांना समाजाविषयी कळकळ असते व त्यांच्या कामातून संघ समाजात पोहोचतो. दोन माणसांचे भेटणे बंद होत नाही तोपर्यंत संघ बंद होऊ शकत नाही. काळासोबत संघाचे कार्य वाढले आहे. आता विरोधक व काही कम्युनिस्ट बोलताना संघाचे आम्ही विरोधक आहोत असे म्हणतात. मात्र, संघ चांगला आहे असेही ते म्हणतात, असा दावा डॉ. मोहन भागवत यांनी केला. अनेकदा माझ्या वक्तव्यांचा विपर्यास होतो. मात्र, त्याचे मला फारसे काही वाटत नाही. उलट मला दया येते व हसू येते. संघाविरोधात बोलायला आता लोकांकडे फारसे काही नाही. मात्र, काही तरी बोलायला हवे म्हणून असे प्रकार करतात, असे सरसंघचालक म्हणाले.
संघ कार्याबाबत 'जेन-झी' अनुकूल
'जेन-झी' असे संबोधित करण्यात येत असलेल्या पिढीमध्ये देशाला मोठे करायचे आहे व आपली परंपरा आणखी समोर न्यायची आहे, असा विचार दिसून येतो. त्यांना प्रामाणिकता व सेवेचे आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांची संघविचारांशी नाळ जुळत असून ते संघकार्याबाबत अनुकूल आहेत, असे ते म्हणाले.