परीक्षा राबविणाऱ्या कंपनीला नाेटीस, संचालकांचा प्रभार हटवला; कुलगुरूंची ताबडताेब कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 20:41 IST2026-03-30T20:41:08+5:302026-03-30T20:41:32+5:30
Nagpur : उन्हाळी परीक्षांची वेळ आली असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळ्यात झालेल्या ६०० हून अधिक परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत.

Notice issued to the company conducting the examination, director's charge removed; Vice Chancellor takes immediate action
नागपूर : उन्हाळी परीक्षांची वेळ आली असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळ्यात झालेल्या ६०० हून अधिक परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. विद्यापीठात पहिल्यांदाच अशी आणीबाणीची परिस्थिती आली असल्याने कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी कठोर पाऊल उचलत परीक्षा राबविणाऱ्या कंपनीला नाेटीस बजावली आणि परीक्षा व मूल्यमापन संचालक मनीष झोडापे यांचाही प्रभार काढून घेतला.
नागपूर विद्यापीठाद्वारे यंदा हिवाळी परीक्षा दीड महिना उशीराने सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर निकाल लवकरात लवकर लावणे अपेक्षित होते. मात्र निकाल लावायला प्रचंड उशीर हाेत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना यंदा डिसेंबर उजाडला. पहिल्या टप्प्यात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या तर दुसऱ्या टप्प्यात नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. यातील अनेक परीक्षा होऊन किमान चाळीस दिवसांचा कालावधी झाला आहे. नियमानुसार, चाळीस दिवसाच्या आत निकाल लावणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप अनेक परीक्षांचे निकाल रखडले आहेत. त्यामुळे कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी कठोर कारवाईचा निर्णय घेतला. यासाठी परीक्षा घेणाऱ्या कंपनीला नोटीस देण्यात आली. तसेच प्रभारी परीक्षा संचालकांचा पदभार काढून मोतीराम तडस यांना प्रभार दिला.
परीक्षा विभागाच्या कामात काहीसा प्रशासकीय बदल आवश्यक होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, परीक्षा विभागाची इमारत ही एलआयटी विद्यापीठाला द्यायची आहे. त्यानंतर जुन्या प्रशासकीय इमारतीमध्ये परीक्षा विभाग हलवण्यात येणार आहे. या संपूर्ण कामांचा पसारा बघता काही निर्णय घेऊन पदांची जबाबदारी बदलण्यात आल्याचे कुलगुरू यांनी स्पष्ट केले.
कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
परीक्षा विभागाचे काम तीन महिन्यांपूर्वी नवीन कंपनीला देण्यात आले. यावर अनेकदा आक्षेप घेण्यात आले. एनएसयूआयनेही यावर आंदोलन करत कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर निकालात विलंब हाेत असल्याने अधिसभेच्या बैठकीत कंपनीच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. यानंतर अखेर कुलगुरूंनीच पुढाकार घेत कंपनीला नोटीस बजावली आहे. तसेच, कामात सुधारणा करण्यासह मनुष्यबळ वाढवण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.