रेल्वे प्लॅटफॉर्मवर काढल्या रात्री ! भारताच्या संरक्षण क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सत्यनारायण नुवाल यांना पद्मश्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:06 IST2026-01-27T16:58:35+5:302026-01-27T17:06:32+5:30
Nagpur : नागपूरच्या मातीवरून जागतिक संरक्षण उद्योगात आपले स्थान निर्माण करणारे उद्योजक सत्यनारायण नुवाल. भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाची नवी परिभाषा घडवणाऱ्या सोलार ग्रुपची कहाणी जिद्द, ध्येयवाद आणि दूरदृष्टीची साक्ष आहे.

Night spent on railway platform! Satyanarayan Nuwal, who made significant contributions to India's defense sector, was awarded Padma Shri
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या मातीवरून जागतिक संरक्षण उद्योगात आपले स्थान निर्माण करणारे उद्योजक सत्यनारायण नुवाल. भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वावलंबनाची नवी परिभाषा घडवणाऱ्या सोलार ग्रुपची कहाणी जिद्द, ध्येयवाद आणि दूरदृष्टीची साक्ष आहे. त्यांच्या कठोर मेहनतीमुळे आणि नेतृत्त्वामुळे सोलार इंडस्ट्रीज आता केवळ भारतात नव्हे, तर ८० देशांमध्ये पोहोचलेली जागतिक कंपनी बनली आहे. भारत सरकारने त्यांच्या योगदानाला मान देत पद्मश्री पुरस्कार प्रदान केला, हा सन्मान त्यांच्या वैयक्तिक यशाबरोबरच 'आत्मनिर्भर भारत'च्या संकल्पाचा गौरव ठरला आहे.
सन १९५२मध्ये सत्यनारायण नुवाल यांचा जन्म राजस्थानच्या भिलवाड्यातील सामान्य कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण करून ते रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रात आले. सुरुवातीला परिस्थिती अतिशय कठीण होती. काही रात्री रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपून काढाव्या लागल्या आणि परिवहन व्यवसायात अपघातामुळे सर्व काही गमावले. मात्र, हार मानली नाही. चंद्रपूरच्या अब्दुल सत्तार भाईंच्या गोदामात स्फोटकांचा लघु भाग भाड्याने मिळाल्याने त्यांना व्यवसायाची संधी मिळाली. या कठीण काळात चिकाटी, धैर्य आणि उद्यमशीलतेची कास त्यांनी सोडली नाही.
नुवाल यांनी सुरुवातीला शाई, मेणबत्ती, ट्रान्सपोर्ट यांसारख्या व्यवसायात प्रयत्न केले. परंतु, अपयशाने त्यांना घाबरवले नाही. नागपूरमध्ये स्थलांतर करून त्यांनी स्फोटक व्यवसायात सुरुवात केली. सुरुवातीला वितरणाचे काम केले. पण, बाजाराची मागणी, कोळसा खाणीतील गरजा आणि गुणवत्ता तपासण्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी स्वतःची उत्पादन धोरणे ठरवली. १९९५ मध्ये स्वतःचा लघु उत्पादन प्रकल्प सुरू करून त्यांनी सोलार इंडस्ट्रीजचा पाया रचला.
पंतप्रधानांकडून गौरव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी स्वतः नागपूरच्या प्रकल्पाला भेट देऊन नुवाल यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. पिनाका रॉकेट प्रणालीसाठी १० हजार कोटींहून अधिक किमतीची ऐतिहासिक ऑर्डर मिळवून त्यांनी भारताला संरक्षण निर्यातदारांच्या पंक्तीत नेऊन बसवले आहे. सत्यनारायण नुवाल यांचा प्रवास एका सामान्य विक्रेत्यापासून जागतिक स्तरावरील 'पद्मश्री' विजेत्या उद्योजकापर्यंतचा आहे. त्यांचा हा प्रवास येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे. प्रामाणिक कष्ट आणि देशसेवेची जिद्द असेल तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरूनही यशाचे उत्तुंग शिखर गाठता येते.
सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणादायी नेतृत्व
नुवाल यांचे ध्येय फक्त उद्योग नाही; त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकास यांत त्यांनी मोठे योगदान दिले. रामदेवबाबा विद्यापीठ आणि माधव नेत्रालय या संस्थांमध्ये नेतृत्व सांभाळले. सोलार ग्रुपमध्ये २५ टक्के महिला कर्मचारी कार्यरत असून, महिलांच्या सक्षमीकरणाला त्यांनी प्राधान्य दिले. तसेच गायत्री परिवार ट्रस्टचे प्रबंध न्यासी म्हणून आध्यात्मिक कार्यही ते सातत्याने चालवत आहेत. पारदर्शकता, नीतिमत्ता आणि गुणवत्ता यांवर आधारित व्यवस्थापनामुळे त्यांना उद्योगजगतात अपूर्व सन्मान मिळाला आहे.
१० हजारांहून अधिक कर्मचारी आणि ८२ देशांत व्यापार
नुवाल यांच्यातील व्यावसायिक कौशल्याची चुणूक पाहून १९८४मध्ये जगातील सर्वांत मोठ्या 'आयसीआय' कंपनीने त्यांना एजंट नियुक्त केले. बघता बघता ते देशातील सर्वांत मोठे डीलर बनले. १९९५मध्ये त्यांनी नागपूरजवळ स्वतःचा उत्पादन प्रकल्प सुरू केला. आज हा समूह चार खंडांत विस्तारलेला असून, १० हजारांहून अधिक कर्मचारी येथे कार्यरत आहेत आणि जगातील ८२ देशांना भारत येथून स्फोटके निर्यात करतो. आज सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड भारतीय संरक्षण दलाला अत्याधुनिक स्फोटके, हँड ग्रेनेड्स, पिनाका रॉकेट्स आणि इतर आयुधे पुरवते. संशोधन व विकासावर भर देत नुवाल यांनी आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले, ज्यामुळे भारत जागतिक संरक्षण निर्यातदारांच्या रांगेत उभा राहिला आहे.
"भारत सरकारकडून 'पद्मश्री' या प्रतिष्ठित नागरी सन्मानाची घोषणा होणे, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मी हा सन्मान माझ्या संपूर्ण 'सोलर कुटुंबाला' समर्पित करतो. सोलर ग्रुपचा अध्यक्ष म्हणून, हा सन्मान देशाच्या संरक्षण प्रणालींमध्ये योगदान देण्याच्या आणि भारताची संरक्षण सज्जता अधिक मजबूत करण्याच्या माझ्या वचनबद्धतेला बळ देतो. मी भारत सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो. माझा ठाम विश्वास आहे की हा सन्मान मला उद्देशपूर्ण भावनेने राष्ट्राची सेवा करत राहण्यासाठी प्रेरित करेल."
- सत्यनारायण नुवाल, चेअरमन, सोलार इंडस्ट्रीज.