राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच, बावनकुळेंचा आरोप
By योगेश पांडे | Updated: June 5, 2023 17:44 IST2023-06-05T17:43:08+5:302023-06-05T17:44:24+5:30
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राममंदिराबाबत वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसीचा सर्वात मोठा शत्रू; मेळावे घेणे म्हणजे नौटंकीच, बावनकुळेंचा आरोप
नागपूर : आगामी निवडणूका लक्षात घेता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ओबीसी समाजाची आठवण आली व ओबीसी मेळावे घेण्यास सुरुवात झाली. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसने दरवेळी ओबीसी समाजाच्या योजनांना विरोध केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्षच ओबीसी समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यांनी घेतलेले ओबीसी शिबीर म्हणजे एक नौटंकीच होती, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
सत्तेत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसने कधीच ओबीसींचा विचार केला नाही. दरवेळी ओबीसीच्या योजनांना विरोध केला. भाजपने कधीच ओबीसीवर अन्याय केलेला नाही. देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून नेहमी खोटारडे आरोप करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असे बावनकुळे म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर नव्हते, मात्र शिंदे-फडणवीस यांच्या सरकारने ओबीसींना आरक्षण मिळवून दिले. राष्ट्रवादीकडे कधीही ओबीसी मते जाणार नाहीत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेदेखील हे चांगल्याने जाणतात, असे बावनकुळे म्हणाले. राममंदिर प्रत्येक व्यक्तीच्या मनातील श्रद्धेचा विषय आहे. राममंदिर हा धार्मिक नव्हे तर लोकांच्या अस्मितेचा मुद्दा आहे. भाजपने कधीच धर्माच्या नावावर मते मागितलेली नाहीत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राममंदिराबाबत वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
शिंदेंच्या उमेदवारांना जास्त ताकदीने मदत करणार
लोकसभा व विधानसभा निवडणूकींचे पूर्ण नियोजन तयार आहे. लवकरच भाजपतर्फे लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात येतील. भाजपच्या उमेदवारांपेक्षा शिंदे यांच्या उमेदवारांना जास्त ताकदीने मदत करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.