नागपूरमधील रस्ते ३१ मेपर्यंत रस्ते दुरुस्त न झाल्यास मनपा करेल कारवाई : आयुक्तांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:13 IST2025-05-28T14:11:53+5:302025-05-28T14:13:42+5:30
Nagpur : महिनोनमहिने खोदकाम केलेले रस्ते चार दिवसांत दुरुस्त कसे होणार?

Nagpur Municipal Corporation will take action if roads are not repaired by May 31: Commissioner warns
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यापूर्वी शहरातील खोदकाम केलेले सर्व रस्ते ३१ मेपूर्वी पूर्ववत करण्यात यावेत अन्यथा संबंधित कंत्राटदारांवर दंड ठोठावण्याचे, तसेच फौजदारी कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी मंगळवारी दिले; परंतु शहरातील चारही भागांत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू असून गेल्या अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेले हे काम येत्या चार दिवसांत कसे पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात सीवर लाइन, पिण्याच्या पाण्याची लाइन आणि इतर कामांसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण करून त्याला पूर्ववत करण्यासाठी बैठक मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आज घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, श्रीकांत वाईकर यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता आणि ही कामे करणारे कंत्राटदार उपस्थित होते. या सर्वांना खोदकाम केलेले रस्ते पुढील चार दिवसांत दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. तसेच कर्तव्यात कुचराई करणाऱ्या महपालिकेच्या संबंधित अभियंत्यांवरसुद्धा कारवाई करण्याचा इशाराही दिला.
पावसाळ्यात रस्ते खोदण्यास बंदी
पावसाळ्यात नागपूर महानगरपालिकातर्फे आता रस्ते खोदण्याची परवानगी कोणत्याही विभागाला किंवा संस्थांना दिली जाणार नाही. जर कोणत्याही विभागाने खोदकाम सुरू केले तर त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली जाईल, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जलवाहिनी टाकण्याचे ७८ टक्के काम पूर्ण
बैठकीत अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी सीवर लाइन, तसेच जलवाहिन्या टाकण्यासाठी सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. अमृत योजना टप्पा २ अंतर्गत ७८.९४ टक्के काम पूर्ण झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जलवाहिनी तसेच फिडर लाइन टाकण्यासाठी ४०.९६ किलोमीटरचे काम सुरू आहे. त्यापैकी ३२.३३ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. सध्या ८.६३ किलोमीटरचे काम अपूर्ण आहे. विशेष म्हणजे, यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत खोदकाम झाले आहे. आता हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सर्व कंत्राटदारांना देण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यास कंत्राटदारांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही डॉ. चौधरी यांनी दिला आहे.
मलबा न उचलल्यास दंड
शहरात झोपडपट्ट्या किंवा अविकसित भागांमध्ये सीवर लाइन टाकण्याची कामे सुरू आहेत. याबद्दल झोननिहाय माहिती देण्यात आली. रस्त्यावर वाहने घसरून पडणार नाही, अशा स्थितीतमध्ये रस्त्यांची कामे झाले पाहिजेत, यासंदर्भात कोणत्याही नागरिकांकडून तक्रार येता कामा नये, रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा मलबा किंवा कचऱ्याचे ढिगारे दिसता कामे नये, हा मलबा उचलण्याची जबाबदारीसुद्धा कंत्राटदारांची आहे, ही कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचा सूचनाही आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिला. हा मलबा उचलला किंवा नाही, याची पाहणी महापालिकेच्या स्वच्छता विभागाने करावी व दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारांवर मोठा दंड ठोठाविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.