मोदी आले अन् एप्रिल फूल बनवून गेले : अशोक चव्हाण यांची बोचरी टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:47 IST2019-04-01T22:45:32+5:302019-04-01T22:47:58+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आले अन् वर्धेत सभा घेत विदर्भातील लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून गेले, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

Modi came and made an April Fool: Ashok Chavan's criticism | मोदी आले अन् एप्रिल फूल बनवून गेले : अशोक चव्हाण यांची बोचरी टीका

काँग्रेसच्या प्रचार सभेत उपस्थितांना हात उंचावून अभिवादन करताना प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, नाना पटोले, अ‍ॅड. अभिजीत वंजारी, माजी महापौर नरेश गावंडे, उमाकांत अग्निहोत्री व उपस्थित मान्यवर.

ठळक मुद्देकेंद्राचा कारभार संघाच्या अजेंडयानुसार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जनतेला बँक खात्यात १५ लाख जमा करण्याचे, वर्षाला दोन कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून ‘अच्छे दिन‘ आणण्याचे स्वप्न दाखविले होते. प्रत्यक्षात मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. आता पुन्हा मोदी आले अन् वर्धेत सभा घेत विदर्भातील लोकांना ‘एप्रिल फूल’ बनवून गेले, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
काँग्रेसच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी पूर्व नागपुरातील कुंभारटोली येथे जाहीर सभा घेतली. या वेळी उमेदवार नाना पटोले, माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री आरिफ नसीम खान, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खा. गेव्ह आवारी, अनंतराव घारड, प्राचार्य बबनराव तायवाडे,अ‍ॅड. अभिजित वंजारी, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, प्रवक्ते अतुल लोंढे, नगरसेवक दुनेश्वर पेठे, पुरुषोत्तम हजारे, माजी महापौर नरेश गावंडे,जयदीप कवाडे, उमाकांत अग्निहोत्री,शकूर नागानी आदी उपस्थित होते.
या वेळी चव्हाण म्हणाले, भाजप देशपातळीवर ‘मैं भी चौकीदार’ अभियान चालवत आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रातील सरकार सर्वसामान्य लोकांसाठी नव्हे तर जवळच्या उद्योगपतीसाठी चालवत आहेत. ‘हवाका मामुली झोका आँधी नही हो सकता’,‘चरखा घुमानेसे कोई महात्मा गांधी नही बन सकता’, असे सांगत केंद्राचा कारभार संघाच्या अजेंडयानुसार सुरू आहे, असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे मोदींच्या हस्ते भूमिपूजन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही भूमिपूजन केले. मात्र गेल्या दोन वर्षात स्मारकांच्या कामाला सुरुवात झालेली नाही.
काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी १२ हजाराहून कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना वर्षाला ७२ हजार देण्याचे आश्वासन दिले आहे. मध्यप्रदेश व राजसथानातील विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. येथे काँग्रेसची सत्ता येताच शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली. केंद्रात काँग्रेस आघाडीची सत्ता असताना सोनिया गांधी यांनी गरीबांना दोन रुपये किलो दराने धान्य देण्याची योजना सुरू केली. भाजपच्या सत्ताकाळात ही योजना बंद करण्यात आली. देशातील लोकांना मत व्यक्त करण्याचा अधिकार राहीलेला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले असल्याचे चव्हाण म्हणाले.
यावेळी नाना पटोले, विलास मुत्तेमवार, चंद्रकांत हांडोरे, आरिफ नसीम खान आदींनी मार्गदर्शन केले.

Web Title: Modi came and made an April Fool: Ashok Chavan's criticism