कामठीतील पेपर कंपनीला भीषण आग ! सात तासानंतर आग आटोक्यात
By गणेश हुड | Updated: February 10, 2026 16:12 IST2026-02-10T16:11:12+5:302026-02-10T16:12:22+5:30
Nagpur : कामठी जवळील उप्पवाडी येथील मेहाडिया इंटरप्रायजेस प्रा.लि.या पेपर प्रोसेसिंग कंपनीला मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली.

Massive fire breaks out at paper company in Kamathi! Fire brought under control after seven hours
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी जवळील उप्पवाडी येथील मेहाडिया इंटरप्रायजेस प्रा.लि.या पेपर प्रोसेसिंग कंपनीला मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनीची संपूर्ण मशिनरी आणि कच्चा माल जळून खाक झाला असून, सुमारे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मधुसुधन उदयप्रकाश मेहाडिया यांच्या मालकीच्या या कंपनीत मंगळवारी पहाटे दिड वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर पेपरचा साठा आणि केमिकल असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की, त्याचे लोळ दुरूनही स्पष्ट दिसत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून शहरातील विविध केंद्रांमधून बंब पाचारण करण्यात आले. यात सिव्हिल लाईन, कळमना, सुगतनगर, त्रिमुर्तीनगर आणि लकडगंज येथील प्रत्येकी १ बंब तर वाठोडा फायर स्टेशन येथील २ बंबांचा समावेश होता. जवळपास ७ तासांच्या थरारानंतर आणि जवानांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मंगळवारी दुपारपर्यंत घटनास्थळी कूलिंगचे काम सुरू होते.
संपूर्ण कंपनी भस्मासाद
या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले. आगीत कंपनीतील पेपर रोल, संपूर्ण मशिनरी, लिफ्ट फोक, लिफ्ट व्हेईकल, एलपीजी सिलिंडर, केमिकल ड्रम्स, फेव्हिकॉल ड्रम्स, एअर कंडिशनर्स आणि सिलिंग फॅन्ससह इतर साहित्य खाक झाले.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.