इराण-इस्रायल युद्ध आणि भारताचे भवितव्य! आचार्य प्रशांत यांनी नागपुरात मांडले भविष्यातील धोके
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:06 IST2026-04-09T11:05:59+5:302026-04-09T11:06:55+5:30
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्ष केवळ एका भौगोलिक क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, असा इशारा आचार्य प्रशांत यांनी दिला.

इराण-इस्रायल युद्ध आणि भारताचे भवितव्य! आचार्य प्रशांत यांनी नागपुरात मांडले भविष्यातील धोके
नागपूर: विश्वविख्यात तत्त्वज्ञ आणि प्रख्यात लेखक आचार्य प्रशांत यांचे नागपूर नगरीत आगमन झाले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी जागतिक युद्धाच्या परिस्थितीवर अत्यंत परखड भाष्य केले. सध्या जग ज्या नाजूक वळणावर उभे आहे, तिथे केवळ शस्त्रांनीच नाही तर चुकीच्या विचारसरणीशीही लढावे लागेल, असे त्यांनी नमूद केले.
युद्धाचे सावट आणि भारताची स्थिती
मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल संघर्ष केवळ एका भौगोलिक क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही, असा इशारा आचार्य प्रशांत यांनी दिला. आजचे जग एकमेकांशी पूर्णपणे जोडलेले आहे. त्यामुळे तिथे सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामाजिक स्थितीवर उमटणे अटळ आहे. अशा संवेदनशील काळात सामान्य नागरिकांनी, विशेषतः तरुणांनी केवळ भावनांच्या आहारी न जाता 'विवेक' आणि 'जागरूकता' ठेवणे हीच काळाची गरज आहे,"असे त्यांनी स्पष्ट केले.
आज 'सुरेश भट सभागृहात' भव्य कार्यक्रम
आचार्य प्रशांत यांच्या नागपूर दौऱ्यातील मुख्य विशेष सत्र आज, ९ एप्रिल रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडणार आहे. या सत्रात ते मानवी जीवन, जागतिक प्रश्न आणि आध्यात्मिक स्पष्टता यावर उपस्थितांशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांना आचार्य प्रशांत यांना प्रत्यक्ष ऐकण्याची आणि आपले प्रश्न विचारण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
विमानतळावरील त्यांच्या आगमनावेळी चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. आजच्या या विशेष सत्रात ते युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची भूमिका आणि तरुणांसमोर असलेली आव्हाने यावर काय मार्गदर्शन करतात, याकडे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.