प्रत्येक स्फोटानंतर चौकशी…निष्कर्ष शून्य?, पुन्हा स्फोट, पुन्हा बळी, चुकांतून कुणी शिकत नाही?
By योगेश पांडे | Updated: March 2, 2026 12:55 IST2026-03-02T12:52:42+5:302026-03-02T12:55:08+5:30
Nagpur : ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात शासकीय यंत्रणांकडून कंपनीकडेच अंगुलीनिर्देश करण्याचे प्रयत्न सुरू होतील.

Investigation after every explosion...no conclusion?, another explosion, another victim, no one learns from mistakes?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणात शासकीय यंत्रणांकडून कंपनीकडेच अंगुलीनिर्देश करण्याचे प्रयत्न सुरू होतील. मात्र, स्फोटक कंपन्यांचा मोठा डोलारा सांभाळणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरदेखील या स्फोटातून अनेक सवाल उपस्थित होत आहेत. देशाच्या संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या ‘सोलार इंडस्ट्रीज’, अमरावती मार्गावरील चामुंडा एक्स्प्लोजिव्ह, भंडारा-पुलगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी नंतर आता ‘एसबीएल’मध्ये झालेल्या या स्फोटाचे हादरे नागपूरपासून ते थेट दिल्लीपर्यंत बसले आहेत. ‘पेसो’सारख्या यंत्रणा खरोखरच नियमितपणे ‘साईट’वर जाऊन मॉकड्रील व तपासणी करतात की केवळ कागदोपत्रीच ‘ऑल इज वेल’ दाखविले जाते, असा सवाल या घटनांतून उपस्थित होत आहे.
अनेक स्फोटक कंपन्यांची सुरक्षा नियमावली बनविणे व त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी ‘पेसो’ (पेट्रोलिअम अँड एक्स्प्लोजिव्हस सेफ्टी ऑर्गनायझेशन)ची असते. ‘पेसो’चे अधिकारी पेपरवर्कच्या बाबतीत एकदम ‘परफेक्ट’ आहेत. त्यामुळे अनेक स्फोटक कंपन्यांमध्ये पेपरवर नियमितपणे मॉकड्रील्स व तपासणी होत असल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कितपत होते हे कामगारांशी चर्चा केल्यावर नेमके लक्षात येते. ‘एसबीएल’कडून तातडीने इमर्जन्सी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा दावा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात ‘लोकमत’ला तेथे अशी यंत्रणाच दिसून आली नाही. स्फोटक कंपनीतील उपकरणे व एकूण प्रणाली नियमानुसार काम करत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी ‘पेसो’ची असते. ‘पेसो’तील आर्थिक कारभार काही काळाअगोदर समोर आला होता. तेव्हापासूनच तेथील कार्यप्रणालीवर शंका उपस्थित करण्यात येऊ लागली होती. आता या स्फोटानंतर तरी ‘पेसो’चे अधिकारी एकूण कार्यप्रणाली सुरक्षा ‘सेंट्रिक’ करण्यावर भर देतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.
कंपन्या कधी होणार गंभीर?
‘एसबीएल’च्या या भीषण स्फोटामुळे स्फोटक कंपन्यांमधील होणाऱ्या दुर्घटना व त्यात होणारे मृत्यू हा विषय परत ऐरणीवर आला आहे. जखमींना तातडीने कंपनीच्या रुग्णवाहिकांनीच दवाखान्यात हलविणे गरजेचे होते. मात्र, कंपनीकडे केवळ दोन रुग्णवाहिका होत्या. बाहेरून शासकीय यंत्रणांच्या रुग्णवाहिका आल्यानंतर मग जखमींना उपचारासाठी नेण्यात आले. नागपुरातील बाजारगाव येथील चामुंडी एक्स्प्लोजिव्हमध्ये जून २०२४ मध्ये झालेल्या स्फोटात हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला होता. कंपनीच्या भूमिकेविषयी माहिती देण्याची जबाबदारीदेखील कुणाकडे आहे, हे अधिकाऱ्यांना माहिती नव्हते. तेथे आवश्यक प्रमाणात रुग्णवाहिकादेखील नव्हत्या.
कामगारांच्या सुरक्षेला कधी मिळणार महत्त्व
स्फोटक कारखाना म्हटला की कामगार आरडीएक्स, बारूदच्या आजूबाजूला काम करणार हे अपेक्षितच आहे. त्यात धोका असला तरी ‘पापी पेट’साठी त्यांना ते करावे लागते. मोठ्या कंपन्या कामगारांना योग्य प्रशिक्षणदेखील देतात. मात्र, लहान कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेवर हवा तसा भर देण्यात येत नाही. अनेक कामगारांना योग्य तांत्रिक प्रशिक्षणदेखील देण्यात आलेले नसते. त्याचीच परिणती अशी मोठ्या स्फोटांमध्ये होते.
मागील पाच वर्षांत झालेले मोठे स्फोट
दिनांक : कंपनी : मृत्यू
२० नोव्हेंबर २०१८ - ऑर्डनन्स फॅक्टरी, पुलगाव - ६
४ सप्टेंबर २०२३ - सोलार एक्स्प्लोझिव्ह - २
१७ डिसेंबर २०२३ - सोलार एक्स्प्लोझिव्ह - ९
१३ जून २०२४ - चामुंडी एक्स्प्लोझिव्ह - ८
२४ जानेवारी २०२५ - ऑर्डनन्स फॅक्टरी, भंडारा - ८
१६ फेब्रुवारी २०२५ - एशियन फायरवर्क - २
४ सप्टेंबर २०२५ - सोलार एक्स्प्लोझिव्ह - २