इंडिगोची नागपूर-गोवा विमान उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 13:25 IST2026-03-24T13:22:08+5:302026-03-24T13:25:15+5:30
Nagpur : इंडिगोची नागपूर-गोवा उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहे. मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उड्डाणाच्या आधी विमानातून फ्यूल लीक होत असल्याचे आढळले होते.

IndiGo's Nagpur-Goa flight service is once again smooth.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंडिगोचीनागपूर-गोवा उड्डाण सेवा पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाली आहे. मागील आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उड्डाणाच्या आधी विमानातून फ्यूल लीक होत असल्याचे आढळले होते. या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे उड्डाण तत्काळ थांबवण्यात आले आणि गोवा तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. मात्र, या बिघाडानंतर मुंबईहून आलेल्या तज्ज्ञांच्या टीमने विमानाच्या 'नोज व्हील' जवळील फ्यूल गळतीचा अचूक शोध घेऊन ती दुरुस्त केली.
सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण केल्यानंतर आणि पूर्ण समाधान झाल्यानंतरच हे विमान 'फेरी फ्लाइट' म्हणून नागपूरहून दिल्लीला पाठवण्यात आले. त्यानंतर ते हैदराबादमार्गे पुन्हा सेवेत दाखल झाले आहे. आता हे विमान पुन्हा प्रवासी सेवेसाठी सज्ज आहे.
दरम्यान, नागपूरहून नवीन उड्डाणांची अपेक्षा असलेल्या प्रवाशांसाठी मात्र थोडी निराशाजनक बातमी आहे. इंडिगोने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही नवीन मार्गावर उड्डाण सेवा सुरू करणे शक्य नाही.
सध्या नागपूरहून दररोज सुमारे २५ उड्डाणे देशातील १० शहरांकडे जातात आणि तेवढ्याच उड्डाणांची ये-जा सुरू आहे. समर शेड्यूलनुसार २९ मार्चपासून काही उड्डाणांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
प्रवाशांवर भाडेवाढीचा बोझा
दरम्यान, आखाती देशात सुरू असलेल्या युद्ध आणि वाढत्या तणावाचा फटका विमान वाहतूक क्षेत्राला बसू लागला आहे. जेट फ्यूलच्या दरात मोठी वाढ झाल्याने एअरलाईन्स कंपन्यांवर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. परिणामी, भाडेवाढ ठरली असून त्याचा भार थेट प्रवाशांवर पडत आहे. ही परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास भविष्यात तिकिटांचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.