वाढत्या ‘स्क्रीन टाईम’मुळे मुलांमधील वास्तव व आभासाची सीमारेषा पुसट
By सुमेध वाघमार | Updated: March 13, 2026 20:26 IST2026-03-13T20:25:54+5:302026-03-13T20:26:29+5:30
Nagpur : स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजची पिढी एका वेगळ्याच मानसिक संकटात सापडली आहे. तासनतास स्क्रीनसमोर घालवल्यामुळे किशोरवयीन मुलांना 'रिअॅलिटी' (वास्तव) आणि 'फेक' (आभासी जग) यातील फरक समजणे कठीण झाले आहे.

Increasing screen time is blurring the lines between reality and fantasy in children
सुमेध वाघमारे
नागपूर : स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजची पिढी एका वेगळ्याच मानसिक संकटात सापडली आहे. तासनतास स्क्रीनसमोर घालवल्यामुळे किशोरवयीन मुलांना 'रिअॅलिटी' (वास्तव) आणि 'फेक' (आभासी जग) यातील फरक समजणे कठीण झाले आहे. या गोंधळलेल्या मानसिकतेतून अनेक मुले नैराश्याच्या गर्तेत ढकलली जात असून, दुर्देवाने आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलत आहे, अशी माहिती अॅडोलेसेंट हेल्थ अकादमीच्या पदाधिकाºयांनी शुक्रवारी दिली.
अकादमीचा पदग्रहण सोहळा उद्या शनिवार दुपारी ३ वाजात हॉटेल तुली एम्पेरिअल येथे आयोजित करण्यात आला आहे. नवी कार्यकारणी पुढील वर्षात कोणकोणते उपक्रम राबविणार याची माहिती देण्यासाठी शुक्रवारी पत्रपरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ने विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात पदाधिकारी बोलत होते. याप्रसंगी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक व अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. अविनाश गावंडे, नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ. दिनेश सरोज, सचिव डॉ. यश बानाईत, माजी अध्यक्ष डॉ. मीना देशमुख व डॉ. गिरीश चरडे उपस्थित होते.
- इतरांसोबत तुलना करण्याची प्रवृत्ती वाढली
डॉ. यश बानाईत म्हणाले, सोशल मीडियावर दिसणारे इतरांचे 'परफेक्ट' आयुष्य, फिल्टर लावलेले फोटो आणि लाइक्स-कमेंट्सचा खेळ यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये तुलना करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. पडद्यावर दिसणारे सर्व काही खरे आहे असे मुलांना वाटू लागते. जेव्हा त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यात साध्या समस्या किंवा अपयश येते, तेव्हा ते सहन करण्याची क्षमता त्यांच्यात नसते. वास्तवातील संघर्षापेक्षा त्यांना आभासी जगातील 'ग्लॅमर' अधिक जवळचे वाटते, आणि तिथूनच मानसिक अस्वास्थ्याची सुरुवात होते.
-६० टक्के किशोरवयीन मुले लठ्ठपणाच्या विळख्यात
शहरातील बदलती जीवनशैली, वाढलेला 'स्क्रीन टाइम', जंक फूडचे अतिसेवन आणि मैदानी खेळांचा अभाव यामुळे शहरातील जवळपास ६० टक्के किशोरवयीन मुले लठ्ठपणाची शिकार झाली आहेत, अशी माहिती डॉ. सरोज यांनी दिली आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
-कमी वयात गंभीर आजारांचा विळखा
डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, पूर्वी जे आजार चाळीशीनंतर दिसायचे, ते आता किशोरवयीन मुलांमध्ये दिसून येत आहेत. लठ्ठपणा हा केवळ वजनाचा प्रश्न नसून तो अनेक आजारांचे मूळ आहे. लठ्ठपणामुळे किशोरवयीन मुलांमध्ये हृदयविकार, मधुमेह, मानसिक ताण वाढला आहे. महत्त्वाचे म्हणजे, पालकांशी संवाद कमी झाल्यामुळे मुले आपल्या भावना मोबाईलमध्येच शोधू लागले आहेत, त्याचे वाईट परिणाम पुढे येत आहे.