पदवी हवी असेल तर नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा द्या : विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे बीबीए, बी. कॉमच्या विद्यार्थ्यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:37 IST2025-05-29T17:36:58+5:302025-05-29T17:37:28+5:30
विद्यापीठाचे फर्मान : बीबीए, बी. कॉमच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

If you want a degree, take the exam with the new syllabus: BBA, B. Com students suffer due to the university's mismanagement
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बीबीए, बी.कॉम.ची पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. या विद्यार्थ्यांनी शेवटचे दोन सेमिस्टर नव्या अभ्यासक्रमाने केले, पण पहिले चार सेमिस्टर जुन्या अभ्यासक्रमाने केल्याने पदवी देण्यास विद्यापीठाने नकार दिला आहे. नवीन अभ्यासक्रमाच्या विषयांची परीक्षा पुन्हा द्या, तरच पदवी मिळेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती आहे.
या विद्यार्थ्यांनी नुकतीच विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र, विद्यापीठाकडून पुन्हा परीक्षा देण्याचा आग्रह केला जात असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी नुकतीच ५ व्या व ६ व्या सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या दोन शेवटच्या सेमिस्टरला त्यांनी नव्या अभ्यासक्रमाने परीक्षा दिली होती. मात्र, या विद्यार्थ्यांचे १ ते ४ सेमिस्टरची परीक्षा जुन्या अभ्यासक्रमांनुसार झाली होती. शेवटचे सेमिस्टर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवीची गुणपत्रिका मिळणे क्रमप्राप्त होते. मात्र, या विद्यार्थ्यांचा निकाल विथल्डमध्ये टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याविषयी विचारणा करायला गेले असता, विद्यापीठाने १ ते ४ सेमिस्टरमध्ये समाविष्ट झालेल्या नवीन कोर्सच्या विषयांची पुन्हा परीक्षा देण्याचे व त्यानंतरच पदवीची गुणपत्रिका मिळेल, असे आदेश विद्यापीठाने काढले आहेत. त्यामुळे बीबीए, बी. कॉमचे अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.
प्रत्येक सेमिस्टरमध्ये दोन विषय समाविष्ट
मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक सेमिस्टरमध्ये नव्या अभ्यासक्रमाचे दोन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना ८ विषयांची परीक्षा पुन्हा द्यावी लागणार आहे. त्यासाठी पदवी पूर्ण करूनही पुन्हा अभ्यास करावा लागणार आहे. ही परीक्षा एकावेळी झाली, तर गोंधळ होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ
विशेष म्हणजे पदवी पूर्ण केल्याची गुणपत्रिकाच मिळणार नाही, तर त्यांना एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे उत्तीर्ण झाल्यानंतरही हे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठाकडून अशाप्रकारे वेळेवर परिपत्रक काढून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.