मराठीत काय सांगतात ते कळत नाही - मग काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 14:09 IST2025-02-27T10:54:06+5:302025-02-27T14:09:19+5:30
Nagpur : येथे शाळा आहेत पण शाळेची मराठी भाषा मुलांना कळतही नाही अन् झेपतही नाही त्यामुळे भाषाचेच दार बंद झाल्याने ज्ञानाची कवाडे कशी उघडायची?

I don't understand what is being said in Marathi - so what to do?
राजेश शेगोकार
नागपूर : ज्या दिवशी आईने पाहिली ओवी म्हटली त्याच दिवशी मराठी भाषा जन्माला आली, भाषा ही जैविक असते..ती बाेलत राहिले तर जिवंत राहते, केवळ पुस्तकात भाषा नसते ती बाेलली पाहिजे...भाषा जाेडणारी असते ताेडणारी नव्हे... ९८ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर थेट पंतप्रधानांसमाेर भाषण करत हाेत्या अन् बाेली भाषेचा आधार घेउन मुलांना मराठीशी जाेडणाऱ्या महाराष्ट्रातील काही प्रयाेगशिल व्यक्तींच्या अंगावर मुठभर मांस चढत हाेते. मातृभाषेशी प्रत्येकाचे मनाचं नाते असते. मातृभाषेतून संवादाचे अन् भावनेचे सौंदर्य बहरत जाते. मात्र ज्यांना स्वत:ची लिपी नाही अशा बोलीभाषिक आदिवासी भागात प्रमाण मराठी भाषेचा संसार साेपा नाही. ऐ तुला मराठीत सांगीतलेले कळत का? की इंग्रजीत सांगु असे ठसक्यात विचारणाऱ्या आर्ची चा संवाद महाराष्ट्राच्या कानाकाेपऱ्यात गाजला पण राज्यातील काही भागात शाळा आहेत पण शाळेची मराठीही मुलांना कळतही नाही अन् झेपतही नाही हे वास्तव आहे. मराठीतून संवादाचे, भाषेचेच दार बंद झाल्याने ज्ञानाची कवाडे कशी उघडायची? भाषेच्या अडचणीचा हा माेठा डाेंगर पार करण्यासाठी काहींनी बाेली भाषेच्या काठीचा आधार घेतला व आज याच काठीने राज्यातील अनेक प्रयाेगशिल शिक्षकांनी केवळ मुलांनाच नव्हे तर अनेक आदिवासी गावांतील ग्रामस्थांनाही मराठीची गाेडी लावली.
गडचिरोलीच्या दक्षिण टोकावरील कोरची तालुक्यातील मोहगाव या छत्तीसगडला चिकटून असलेल्या या गावातील विद्यार्थ्यांची मातृभाषा छत्तीसगडी आहे. मराठी शाळा असल्याने शिक्षकही मराठीच. त्यामुळे छत्तीसगडीमध्ये त्यांना शिकवणे कठीण जायचे, पण या शाळेत शिक्षक फिरोज फुलकवर हे रुजू झाले. ते मूळचे कोरची तालुक्यातीलच रहिवासी. त्यांचे लहानपण छत्तीसगडी कुटुंबांसोबत वावरण्यात गेले. त्यामुळे त्यांचे या भाषेवर प्रभुत्व. विद्यार्थ्यांची अडचण दूर करण्यासाठी ते एकेक विषय मराठीतून छत्तीसगडमध्ये भाषांतर करुन शिकवू लागले, पण पेपर मराठीतच सोडवावा लागणार असल्याने पुन्हा छत्तीसगडमधून मराठी भाषांतर करुन मुलांना मराठीच्या मार्गावर आणले अन् शिक्षणाची गाडी मराठीचा झेंडा मिरवित सुसाट पळाली.
छत्तीसगड सीमेवरील गाेंदिया जिल्ह्यातील रेहळी हे गाव भाषेची आणखी एक प्रयाेगशाळा. मुलांना मराठी येत नाही आणि शिक्षकांना छत्तीसगडी येत नाही. त्यामुळे शाळेकडे अनेक मुलांनी पाठ फिरविली होती. हे गाव गाधीच नक्षलवाद्यांच्या भीतीने ग्रासलेले. अशातच मंगलमूर्ती सयाम हे शिक्षक या शाळेवर रूजू झाले त्यांनी पालकांशी संवाद साधत आपलेसे केले. विद्यार्थ्यांना आधी छत्तीसगडीतून शिक्षण देत हळूहळू मराठीवर आणून त्यांना मराठीत शिक्षण देण्याचे काम केले छत्तीसगडीशिवाय कोणतीही भाषा न समजणाऱ्या रेहळी गावात आता विद्यार्थी तर सोडा, ५० टक्के नागरिकही मराठी बोलू लागले.
गडचिरोलीतीलच धानोरा तालुक्यात असलेल्या अतिदुर्गम मोहगाव येथे तर ग्रामसभेच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षांपासून गोंडी भाषिक पहिली आदिवासी
निवासी शाळा चालविली जात आहे. कोया ज्ञानबोध संस्कार गोटूल निवासी शाळा असे तिचे नाव आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेला प्राथमिक शिक्षण विभाग व राज्य शासनाची मान्यता नाही त्यामुळे ही शाळा अनधिकृत आहे, अशी नोटीस बजावून १ लाखाचा दंड शिक्षण समितीवर ठोठावला आहे. शासनाच्या निर्णया विरोधात ग्रामसभा शिक्षण समितीने न्यायालयात धाव घेतली आहे पण शाळा सुरूच आहे येथे गाेंडीसह हिंदी इंग्रजी व मराठीचीही गाेडी मुलांना लागली आहे.
अकाेल्याच्या सिमेवरील सातपुडा पर्वत रांगांमध्ये वास्तव्यास असलेल्या कोरकू भाषिक आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोरकू मधून मराठी भाषेची ओळख देण्याची धडपड करणारे शिक्षक तुलसीदास किसनराव खिरोडकर हे आणखी एक भाषास्नेही. कोरकू भाषिक आदिवासी विद्यार्थ्यांना प्रमाण मराठी भाषा शिकताना व शिक्षकांना शिकवताना शैक्षणिक साहित्य म्हणून त्यांनी बालस्नेही या पुस्तकाची निर्मिती केली. संख्या ओळख, वाचन, पाढे, कोरकू भाषेत अंकगीत इतकेच नव्हे तर मराठी पाठ्यपुस्तकातील कविता, गीते कोरकू भाषेत सुभाष केदार यांनी अनुवादीत करून दिली व भाषेचा पुढचा प्रवास आनंददायी झाला.
मुंबई-ठाणे-रायगड-नाशिक मधील अनेक स्थानिकांची आगरी ही बोली भाषा आहे. सर्वेश तरे हा युवा साहित्यिक ‘आगरी शाला’ नावाचे प्रशिक्षण चालविताे भाषाच नव्हे तर आगरी संस्कृतीच्या संवर्धनातील हा आणखी एक वारकरी. खान्देश, मराठवाडा असाे की काेकण अशा लहान माेठे नंदादीप मराठी भाषेसाठीच उजळत आहेत. मराठीचा सुर्य तळपत राहावा यासाठी प्रतिकुल हवेतही ते तग धरून आहेत..
जिथे मराठीतच कळत नाही तिथे बाेलीचा आधार घेत भाषेची गाेडी लावण्याचा हा ‘संवाद’ यशस्वी झाला आहे. यामागे अंतिमत: मराठी कळली पाहिजे अन् पुढे जगली पाहिजे हाच हेतू आहे हे नाकारून कसे चालेल. अभिजात मराठीचा झेंडा आज गाैरवाने फडकत आहे या झेंड्याचा दांडा अशा शेकडाे बाेली भाषांनी बनलेला आहे हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.