मानव तस्करीचा पर्दाफाश : बिहारमधून महाराष्ट्रात आणली जात होती ३३ मुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:06 IST2019-06-27T22:04:47+5:302019-06-27T22:06:32+5:30

हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार येथून महाराष्ट्रात आणल्या जात असलेल्या ३३ अल्पवयीन मुलांची बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वे स्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केला.

Human trafficking exposed: 33 children from Bihar were being brought to Maharashtra | मानव तस्करीचा पर्दाफाश : बिहारमधून महाराष्ट्रात आणली जात होती ३३ मुले

मानव तस्करीचा पर्दाफाश : बिहारमधून महाराष्ट्रात आणली जात होती ३३ मुले

ठळक मुद्देराजनांदगाव येथे हावडा-मुंबई मेलमधून केली सुटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हावडा-मुंबई मेलद्वारे बिहार येथून महाराष्ट्रात आणल्या जात असलेल्या ३३ अल्पवयीन मुलांची बुधवारी सुटका करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारावर आरपीएफ व पोलिसांनी छत्तीसगड येथील राजनांदगाव रेल्वे स्टेशनवरून या मुलांची सुटका करून मानव तस्करीचा पर्दाफाश केला.
ही सर्व मुले बिहार येथील भागलपूर जिल्ह्यातील तिरपैती गावातील आहेत. त्यांना हावडा ते मुंबई जात असलेल्या हावडा मेलच्या बोगी क्रमांक एस-५ आणि एस-७ मधून नंदूरबार जिल्ह्यात घेऊन जात होते. अ‍ॅड. स्मिता पांडे यांनी हा प्रकार उघडकीस आणला. त्या रायपूर येथून राजनांदगावला जात होत्या. एका व्यक्तीसोबत इतक्या मोठ्या प्रमाणावर अल्पवयीन मुलांना पाहून त्यांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांचा संशय आणखी बळावला. त्यांनी पोलिसांना सूचित केले. अशी सूचना मिळताच पोलीस कर्मचारी आणि रेल्वे पोलीस तातडीने राजनांदगाव रेल्वे स्टेशनवर पोहोचले. तेथील प्लॅटफॉर्म नंबर दोनवर हावडा वरून मुंबईला जात असलेली हावडा-मेल रेल्वेगाडी थांबताच बोगी क्रमांक एस-५ व एस-७ मधील मुलांना खाली उतरवण्यात आले. यासोबतच इतर मुलांना घेऊन जात असलेल्यांना उतरवण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व मुले ७ ते १३ वर्ष वयोगटातील आहेत. मुलांसोबत पकडण्यात आलेल्या आरोपीचे म्हणणे आहे की, या सर्व मुलांना मदरस्यात घेऊन जात आहे. परंतु आरोपी कुठल्याही प्रकारचे दस्तावेज दाखवत नाही आहे. आरपीएफने सर्व मुलांना आपल्यासोबत नेले. मुलांची विचारपूस सुरू आहे.
मानव तस्करीची शंका
पोलीस अधिकारी यू.बी.एस. चौहान यांचे म्हणणे आहे की, मानव तस्करीची शंका नाकारता येत नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. तपासानंतरच प्रकरण नेमके काय आहे ते उघडकीस येईल. पकडण्यात आलेले सर्व लोक एकाच समुदायातील आहेत. ही बाब लक्षात ठेवूनही तपास केला जात आहे.

Web Title: Human trafficking exposed: 33 children from Bihar were being brought to Maharashtra