मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती याची वाट पाहतो ? जयंत पाटील यांचा चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:31 IST2025-07-26T15:31:21+5:302025-07-26T15:31:53+5:30
Nagpur : कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाचा नाही, मुख्यमंत्र्यांनी हे ठरवायचे आहे.

How much patience do we have to wait for the Chief Minister? Jayant Patil's tweezers
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाचा राजीनामा घ्यायचा, कुणाचा नाही, मुख्यमंत्र्यांनी हे ठरवायचे आहे. आम्ही विरोधात आहोत. आम्ही विचार करून काही होणार नाही. सरकार कसे चालवायचे, हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे आहे. मुख्यमंत्र्यांची सहनशीलता किती आहे आणि या सगळ्यासंदर्भात ते काय निर्णय घेतात, याची आम्ही वाट पाहात आहोत, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी काढला.
शुक्रवारी नागपुरात आले असता आ. जयंत पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विधानसभेच्या आधी खिशात पैसे नसताना हजारो कोटी रुपये खर्च करण्याचे निर्णय घोषित करण्यात आले. दिवसाला शंभर शंभर निर्णय घेतले जात होते. सरकार गतिमान आहे, असं वाटत होतं. आता त्याची गती काय आहे, महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे.
...अन् दिनक्रमच मांडला
भाजप नेत्यांना भेटले का, असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले, जेवण केलं... बसलो आणि विमानतळावरून परत आलो, असा सगळा दिनक्रमच त्यांनी सांगितला.
सरकारने वेळीच भानावर यावे
महाराष्ट्रात संजय गांधी निराधार योजना, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना पैसे मिळणे कठीण झाले आहे.
काही दिवसांनी सरकारी कामगार आणि नोकरदारांचे पगार उशिरा होतील. आर्थिक परिस्थिती बिकट व्हायला लागली, असे दिसत आहे.
राज्यावर साडेनऊ लाख कोटी इतके कर्ज आहे. १५ ते १६ लाख कोटीपर्यंत राज्य कर्ज काढू शकते. पण, हे शहाणपणाचे लक्षण नाही, यात सरकारने वेळीच भानावर येऊन सुधारणा करणे गरजेचे आहे, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला.