महामानवांनी देशाला दिशा दिली
By Admin | Updated: August 10, 2015 02:48 IST2015-08-10T02:48:43+5:302015-08-10T02:48:43+5:30
शोषित व वंचित समाजापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे; ...

महामानवांनी देशाला दिशा दिली
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा : मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
नागपूर : शोषित व वंचित समाजापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. महात्मा जोतिबा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे; शिवाय त्यांनी वंचित समाजाला समानतेचा अधिकार मिळवून दिला, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने रविवारी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून केंंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. मंचावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, सुधाकर देशमुख, प्रकाश गजभिये, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, नागो गाणार, मल्लिकार्जुन रेड्डी, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, समाज कल्याण विभागाचे आयुक्त रणजितसिंग देओल व अपंग कल्याण आयुक्त नरेंद्र पोयाम उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व संत रविदास पुरस्काराचे विशेष संस्था व व्यक्तींना थाटात वितरण करण्यात आले.
मुख्यमंत्री म्हणाले, समाजातील शोषित, वंचित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यापर्यंत शैक्षणिक व आर्थिक सुविधा पोहोचणे आवश्यक आहे.
राज्य शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. परंतु खरा विकास साध्य करण्यासाठी त्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील वंचितांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या पुरस्कारप्राप्त संस्था व व्यक्तींची जबाबदारी अधिक वाढली आहे.
या संस्था व व्यक्ती समाजापुढे आदर्श ठरणार असल्याचेही ते म्हणाले. महापुरुषांसह थोर समाजसुधारकांच्या विचारांचे आदर्श ठेवून स्वातंत्र्य, समता व बंधूता या सामाजिक न्याय तत्त्वाचे पालन करण्यासाठी शासन कटिबद्ध असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर लवकरच भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच लंडन स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले, ज्या संस्था व व्यक्तींनी संपूर्ण जीवन शोषित व पीडित समाजासाठी काम केले, त्यांचा हा गौरव करण्यात आला आहे. या संस्था समाजात चांगले काम करीत आहे.
शोषित पीडित समाजात शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी अध्यक्षीय भाषणातून दलित शोषित समाजाच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळात गैरव्यवहार करणाऱ्यांना करागृहात पाठविणार असल्याचे म्हणाले. (प्रतिनिधी)
पुरस्काराचे मानकरी
या सोहळ्यात मुंबई येथील भिक्कू संघाज युनाटेड बुद्धिस्ट मिशन, सर्वोदय बुद्धविहार, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, प्रबोधिनी ट्रस्ट नाशिक, वनवासी सेवा समिती जामोद, विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन रिसर्च सेंटर औरंगाबाद व कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था नागपूर यांना शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच अण्णाभाऊ साठे साहित्य व कला अकादमी नागपूर, अण्णाभाऊ साठे ह्युमन अॅण्ड कल्चरल सोसायटी नांदेड, जोशाबा शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवक मंडळ कोल्हापूर व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोककला मंडळ किल्लारी यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार, नांदेड येथील महाराष्ट्र चर्मकार परिषद व अवधूत को-आॅपरेटिव्ह सोसायठी यांना संत रविदास पुरस्कार देण्यात आला. याशिवाय वैयक्तिक पुरस्कारामध्ये यशवंत रामचंद्र भिसे पुणे, दत्ताबापू काळूके बीड, लहानू नाडे औरंगाबाद, रामचंद्रप्पा गायकवाड उस्मानाबाद, मुक्ताबाई दुंडे गोंदिया, बाजीराव शिंदे पुणे, प्रभाकर शिरसाठ मुंबई, उत्तम लहुबंदे मुंबई, साखराबाई बगाडे ठाणे, युवराज मगदुम ठाणे, रमेश वैरागर नाशिक, संभाजी कांबळे नाशिक, श्रीकांत साठे अहमदनगर, रामचंद्र पाखरे जळगाव, प्रल्हाद कांबळे पुणे, शांताराम जोगदंड पुणे, संजय शेजवळ औरंगाबाद, यशोदाबाई कोरडे हिंगोली, कृष्णा वानखेडे नागपूर, शंकर वानखेडे नागपूर, दिगंबर घंटेवाड नांदेड, छायाबाई घोरपडे लातूर व वामन श्रीपद आमटे चंद्रपूर यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच बाळकृष्ण कांबळे ठाणे, सरोज बिचुरे मुंबई, भरत कारंडे पुणे, ईश्वरदास सोनवणे भंडारा व लीलाधर कानोडे नागपूर यांना संत रविदास पुरस्कार व मुंबई येथील नटवरलाल रघुनाथ खरे यांना कर्मवीर दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार प्रदान केला.