नागपूर-नाशिक प्रवाशांसाठी खुशखबर! ‘ट्रेन ऑन डिमांड’ अंतर्गत दोन विशेष गाड्या
By नरेश डोंगरे | Updated: July 17, 2025 19:39 IST2025-07-17T19:38:37+5:302025-07-17T19:39:56+5:30
रेल्वेचा विशेष निर्णय: नागपूर ते नाशिक मार्गावर गर्दी कमी करण्यासाठी अतिरिक्त गाड्या

Good news for Nagpur-Nashik passengers! Two special trains under 'Train on Demand'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरपासून नाशिक पर्यंत रेल्वेने प्रवास करणारांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आज एक गूड न्यूज दिली आहे. ‘ट्रेन ऑन डिमांड’ योजनेच्या अंतर्गत पुढच्या आठवड्यात या मार्गावर दोन एकेरी गाड्या चालविल्या जाणार आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या नागपूर विभागामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, नागपूर ते नाशिक रोड दरम्यान विशेष अनारक्षित दोन 'वन-वे ट्रेन'चे संचालन करण्यात येणार आहे. २३ आणि २४ जुलै २०२५ रोजी या गाड्या धावणार आहेत.
ही विशेष गाडी २३ आणि जुलैला नागपूरहून रात्री ७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता नाशिक रोड रेल्वे स्थानकावर पोहोचेल. या गाडीचा प्रवास सुमारे १० तासांचा असून मार्गातील विविध महत्वाच्या स्थानकांवर तिचे थांबे असणार असल्याने त्या-त्या भागातील प्रवाशांसाठीही या गाडीचा लाभ होणार आहे.
मार्गावरील थांबे
नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामनगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक रोड ला या गाड्या थांबणार असल्याने विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. खासकरून नाशिकमधील यात्रा, व्यापारी तसेच धार्मिक पर्यटनामुळे होणारी गर्दी नियंत्रित करण्यास या गाड्यांमुळे मदत होणार आहे.
१८ अनारक्षित कोच
या गाडीमध्ये एकूण १८ अनारक्षित कोच असतील. त्यात १६ सामान्य तर २ एसएलआरडी कोचचा (गार्डसह लगेजची वाहतूक करणारे कोच) समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, ही गाडी पूर्णतः अनारक्षित स्वरूपात असल्यामुळे अगदी ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचे तिकिट काढता येणार आहे. या गाडीला ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नसल्यामुळे रेल्वे स्थानकावरच जाऊन तिकिट काढता येणार आहे.
रेल्वेच्या ‘ट्रेन ऑन डिमांड' प्रतिसाद:
रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या काळात प्रवाशांची गरज ओळखून मागणीनुसार गाडी (ट्रेन ऑन डिमांड) चालिवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. २३ आणि २४ जुलैलाच नागपूर ते नरखेड या मार्गावरही दोन विशेष अनारक्षित गाड्या चालविण्याचे रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच जाहिर केले आहे. यामुळे शेकडो प्रवाशांना सुविधाजनक प्रवास करता येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या या योजनेचे प्रवाशांकडून स्वागत करण्यात येत आहे.