उड्डाणापूर्वीच इंडिगोच्या विमानातून इंधन गळती; पायलटच्या सतर्कतेने दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:47 IST2026-03-17T12:46:13+5:302026-03-17T12:47:11+5:30
Nagpur : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. गोव्याला जाण्यासाठी सज्ज असलेल्या इंडिगोच्या विमानातील 'नोज व्हील'मधून अचानक इंधन गळती सुरू झाली.

Fuel leak from IndiGo plane before takeoff; Pilot's alertness averted accident
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. गोव्याला जाण्यासाठी सज्ज असलेल्या इंडिगोच्या विमानातील 'नोज व्हील'मधून अचानक इंधन गळती सुरू झाली. सुदैवाने, विमान धावपट्टीवर असतानाच ही बाब तांत्रिक पथकाच्या लक्षात आली आणि उड्डाण थांबविण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.
इंधन गळती झालेले विमान सध्या नागपूर विमानतळावरच 'ग्राउंडेड' करण्यात आले आहे. तांत्रिक तपासणी आणि दुरुस्ती होईपर्यंत हे विमान उड्डाण करू शकणार नाही.
नेमकी घटना काय ?
नागपूर ते गोवा जाणारे इंडिगोचे विमान (६इ ६०४९) सकाळी ११ वाजता उड्डाण करणार होते. सर्व प्रवासी विमानात बसले होते आणि विमान टेक-ऑफसाठी धावपट्टीवर जात होते. त्याच वेळी विमानाच्या पुढच्या चाकाजवळून इंधन गळती होत असल्याचे निदर्शनास आले. वैमानिकाने तत्काळ विमान थांबवून ते पार्किंग-वेमध्ये परत नेले. सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरविण्यात आले.
एका बिघाडाचा तीन फ्लाइट्सना फटका
या तांत्रिक बिघाडामुळे केवळ गोव्याचेच नाही, तर मुंबईच्या प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला. या प्रवाशांना पाठविण्यासाठी इंडिगोने मुंबईला जाणाऱ्या विमानाची व्यवस्था केली आणि दुपारी १च्या सुमारास त्यांना रवाना केले. मुंबईला जाणारे विमान गोव्याला पाठविल्यामुळे मुंबईच्या विमानाला तब्बल साडेसहा तास उशीर झाला. दुपारी १२:५५ची फ्लाइट थेट सायंकाळी ६:४०ला नियोजित करण्यात आली. काही प्रवाशांनी नवी मुंबईच्या विमानाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथेही जागा उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण झाली.
मोठे विमान मागवून प्रवाशांची सोय
मुंबईच्या १८० हून अधिक प्रवाशांचा वाढता संताप पाहून इंडिगोने अखेर मार्ग काढला. दोन वेगवेगळ्या फ्लाइट्सच्या प्रवाशांना एकत्रित नेण्यासाठी २३६ आसनी क्षमतेचे मोठे विमान नागपुरात मागविण्यात आले. त्यानंतर, रात्री उशिरा या सर्व प्रवाशांना मुंबईला रवाना करण्यात आले.