रोजगार गेला, आम्ही करायचे तरी काय? ५ मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थ्यांची आत्महत्या ; राज्यात १९ आंदोलने
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:19 IST2026-03-11T17:11:32+5:302026-03-11T17:19:56+5:30
Nagpur : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या युवक-युवतींच्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत.

Employment gone, what should we do? 5 CM youth trainees commit suicide; 19 protests in the state
लोकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत विविध शासकीय कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या युवक-युवतींच्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. मानधनातील अनियमितता, भवितव्याबाबतची अनिश्चितता आणि कायमस्वरूपी नोकरीची हमी नसल्याने प्रशिक्षणार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. आता आम्ही मरायचे की जगायचे? असा सवाल करत राज्यभरातील प्रशिक्षणार्थ्यांनी शासनाकडे तातडीने न्याय देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केले होते. युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण मिळावे, शासकीय कामकाजाचा अनुभव प्राप्त व्हावा. भविष्यात शासकीय सेवेत संधी निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने ही योजना सुरू केली होती. मात्र प्रत्यक्षात अनेक प्रशिक्षणार्थ्यांना केवळ कामाचा वाढता ताण आणि अत्यल्प मानधन यांचाच सामना करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्रशिक्षणार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक कार्यालयांमध्ये मानधन वेळेवर मिळत नाही, तर काही ठिकाणी महिनोंमहिने मानधन प्रलंबित राहते. वाढत्या महागाईच्या काळात इतके कमी मानधनात घरखर्च, प्रवास आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण होत असल्याने अनेक युवक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परिणामी, काही प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण सोडण्याची वेळही आली आहे. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये वाढत्या नैराश्याचेही चित्र समोर येत आहे. राज्यात आतापर्यंत पाच प्रशिक्षणार्थ्यांनी आत्महत्या केल्याने हा प्रश्न गंभीर असल्याचे आकाश माटे, किशोर निस्ताने, अभय बोबडे, अक्षय करकाळे, अक्षय लांजेवार, हेमंत डेंगे, अतुल कोठारे, शितल सहारे, कल्याणी देशमुख, मयूर ठाकूर, दीपाली भुते, निखीता पातुरकर, प्रांजली सेलोकरसह तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांकडून करण्यात आला.
युवकांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर
याबाबत प्रशिक्षणार्थ्यांचे प्रतिनिधी बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितले की, राज्यभरातील प्रशिक्षणार्थ्यांनी आतापर्यंत आपल्या मागण्यांसाठी १२ वेळा आंदोलने केली आहेत. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही प्रशिक्षणार्थ्यांनी आंदोलन केले असता पोलिसांकडून लाठीमार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. युवकांच्या भवितव्याचा प्रश्न गंभीर आहे.
"वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर कुटुंबाचा सर्व भार माझ्यावरच आला. समाजाकडून किंवा नातेवाईकांकडून फारसा आधार मिळाला नाही. सध्या मी माझ्या वृद्ध आईसोबत कसाबसा उदरनिर्वाह करीत आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत मला भागीमहारी ग्रामपंचायतीत ११ महिन्यांपर्यंत काम करण्याची संधी मिळाली होती. त्या मानधनावरच आमच्या घराचा खर्च काही प्रमाणात चालत होता. मात्र राज्य शासनाने हे पदच कमी केल्यामुळे अचानक माझा रोजगार गेला."
- प्रफुल्ल शेंदरे, भागीमहारी, ता. पारशिवनी