लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यातच पारा चढला आहे. त्यात पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने आराखडा तयार केला आहे. यंदा नवीन बोअरवेलपेक्षा 'फ्लशिंग'वर भर देण्यात आला आहे. उपयायोजनेसाठी ३७ कोटी ४९ लाख रुपयांच्या खर्चाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.
आराखड्यात ४०० हून अधिक गावांत १ हजार ४६ उपाययोजना केल्या जाणार आहेत. यावर्षी नवीन बोअरवेल न घेता जुन्या बोअरवेलच्या फ्लशिंगवर पाणीपुरवठा विभागाचा अधिक भर राहणार आहे. तसेच यामध्ये नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहीर विशेष दुरुस्ती, टँकर, खासगी विहीर अधिग्रहण, गाळ काढणे, विहिरींचे खोलीकरण आदी उपाययोजनांची कामे होणार आहेत.
पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात एकाही गावात पाण्यासाठी टँकर सुरू करण्यात आलेले नाही. परंतु गेल्यापावसाळ्यात काही भागात पुरेसा पाऊस झाला नसल्याने टँकरची गरज भासू शकते. मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. मागील वर्षी जिल्ह्यात ११ टँकरने टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता. यात प्रामुख्याने हिंगणा तालुक्यांतील गावांचा समावेश होता.
'फ्लशिंग'च्या ८७५ कामांना मंजुरीटंचाई आराखड्याअंतर्गत ८७५ विंधन विहिरींच्या 'फ्लशिंग' कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक १७१ विंधन विहिरीची कामे केली जाणार आहे. मागणीनुसार टैंकर व गरजेनुसार विहीर अधिग्रहण करणार असल्याची माहिती जि. प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर यांनी दिली.
बोअरवेल पुनरुज्जीवित करण्यावर भरबोअरवेल पुनरुज्जीवित करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा मर्यादित राहतो व नव्याने बोअरवेल करण्याची गरजही भासत नाही. सोबतच बोअरवेलवर होणारा अतिरिक्त खर्च टाळता येतो.