मयताच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई : हायकोर्टाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 21:24 IST2019-08-27T21:23:55+5:302019-08-27T21:24:58+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भरपाई दुप्पट करण्यात आली.

मयताच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई : हायकोर्टाचा निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वेअपघातात ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली. २२ डिसेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार भरपाई दुप्पट करण्यात आली. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला.
महादेव बनसोड असे मयताचे नाव असून तो रामगाव, ता. धामणगाव, जि. अमरावती येथील रहिवासी होता. २५ डिसेंबर २००४ रोजी महादेव बडनेरा येथून धामणगावला जात होता. त्याने प्रवासाचे तिकिट खरेदी केले होते. दरम्यान, धावत्या रेल्वेतून खाली पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची पत्नी गुंफाबाई व मुलगा गजानन यांनी भरपाई मिळण्यासाठी रेल्वे दावा न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला होता. १९ एप्रिल २०१० रोजी न्यायाधिकरणने त्यांना चार लाख रुपये भरपाई मंजूर केली होती. त्या निर्णयाविरुद्ध मध्य रेल्वेने उच्च न्यायालयात प्रथम अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता रेल्वेचे अपील फेटाळून वरीलप्रमाणे सुधारित निर्णय दिला. महादेवचा स्वत:च्या चुकीमुळे मृत्यू झाला. त्याच्याकडे रेल्वे तिकिट आढळून आले नाही. त्यामुळे त्याला भरपाई दिली जाऊ शकत नाही असे रेल्वेचे म्हणणे होते. परंतु, महादेव प्रामाणिक प्रवासी नव्हता हे रेल्वेला सिद्ध करता आले नाही. वारसदारांतर्फे अॅड. अनिल बांबल यांनी कामकाज पाहिले.