'हुंडाबळी' महाराष्ट्राच्या लेकींची व्यथा : वैष्णवी गेली...पण मोनाली अजूनही लढतेय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 11:26 IST2025-06-02T11:24:26+5:302025-06-02T11:26:03+5:30
प्रश्न समाजासमोर उभा आहे, मोनालीसारख्यांसाठी न्याय कुठे आहे ?

'Dowry death' The pain of Maharashtra's women: Vaishnavi is gone...but Monali is still fighting!
बालाजी देवर्जनकर
नागपूर : वैष्णवी हगवणे. एक नाव. पण मागे असंख्य प्रश्नांची किनार. संपत्तीच्या हव्यासाने, हुंड्याच्या विकृतीने तिचा प्राण घेतला गेला. महाराष्ट्र हादरला. मोर्चे निघाले, पोस्ट्स लिहिल्या गेल्या; पण ही एकटी वैष्णवी नव्हती. अशा अनेक वैष्णवी आपल्या आजूबाजूला जगत आहेत. फक्त त्यांचा मृत्यू 'बाहेरून' दिसत नाही. त्यांचा जीव दररोज थोडा थोडा संपत असतो. मोनाली (नाव बदललेलं) अशीच एक 'जिवंत वैष्णवी'. फरक इतकाच की तिच्या शरीरावर कोणतेही जखमांचे ठसे नाहीत, पण आतल्या आत ती कोलमडलेली आहे.
ती चंद्रपूर जिल्ह्यातील. नागपूरच्या एका सुसंस्कृत घरात लग्न होऊन आलेली मोनाली. आई-वडिलांनी आयटी क्षेत्रातील प्रवीणशी (बदललेलं नाव) तिचं लग्न लावलं. काही वर्ष खूप छान गेली. संसार खुलला. एक सुंदर मुलगाही झाला. त्याचा पाचवा वाढदिवस सेलिब्रेशन हॉलमध्ये दणक्यात साजरा झाला. वरवर पाहता सगळं परिपूर्ण. पण आतून? घराचा आत्मा विदीर्ण होत होता. प्रवीण शांत होता, समजूतदारही. पण कुठल्यातरी दबावाने तो पोखरला जात होता. मोनालीवरही टोचणाऱ्या, अपमानजनक बोलांनी वार होत होते. शेवटी एक दिवस प्रवीण 'देवदर्शनाला जातो' असं म्हणून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी रेल्वे रुळावर त्याचा मृतदेह सापडला. तो १५ ऑगस्ट होता. स्वातंत्र्यदिन ! पण मोनालीसाठी कैदेत ढकलला गेलेला दिवस!
प्रवीणच्या मालमत्तेवर मोनालीचा कायदेशीर हक्क होता; पण तिच्या विधवापणावर, एकटेपणावर, स्त्रीत्वावर समाजाने प्रश्नचिन्ह केलं. सासरच्यांचा तिरस्कार वाढला. मानसिक छळ, अपमान, अवहेलना इतक्या पातळीवर पोहोचली की तिला माहेरी परत यावं लागलं. माहेरही थांबवलं नाही. मालमत्तेच्या नावाखाली भावनांवर व्यापार झाला. 'न्याय' या शब्दाची विडंबना झाली. तिच्या गरजेत तिने आधार शोधला. एक विश्वासू जोडीदार निवडला. पुन्हा फसवणूक. पुन्हा झुंज; पण मोनाली अशक्त झाली नाही. नंतर विश्वास ठेवून एका बँक अधिकाऱ्याशी लग्न केलं. मुलगा झाला. थोडं स्थैर्य लाभलं; पण जुन्या सासरचा विळखा इथेही पोहोचला. खोट्या गोष्टी, खोटे आरोप. 'ती चाकू घेऊन आली', 'हल्ला केला' अशा तक्रारी. सासूने घराबाहेर काढलं. अधिकारी नवऱ्यानेही नको राहू इथे म्हटले. त्याच शहरात किरायाच्या घरात दोन मुलांसह तिने नव्याने सुरुवात केली. मोठ्या मुलाच्या शिक्षणासाठी ती तुटत असताना घरमालक तिच्या मदतीला देवदूतासारखे उभे राहिले. आता परत ती सगळं सोडून मुलाला घेऊन माहेरी परतली आहे.
आज तिचा दुसरा नवरा तिच्या दुसऱ्या मुलाला 'वारस' म्हणून हक्काने हवा आहे, त्याला घटस्फोट हवा आहे; पण मोनाली नको. तिच्या सासूने कोर्ट, पोलिस, मानसिक छळाचं जाळं पसरवलं आहे. मोनाली थकली आहे. पहिला नवरा हरवला. दुसरा 'असा' निघाला. आता विश्वास ठेवायचा कुणावर ? हा प्रश्न फक्त मोनालीचा नाही. समाजातील हजारो मौन वैष्णवींचा आहे. ज्यांच्या वेदनांना शब्द नाहीत. जे कायद्याने हक्क मिळवतात, पण मनःस्वास्थ्य गमावतात. तिची झुंज थांबणार नाही. मोनाली लढतेय. कारण ती आई आहे, स्त्री आहे आणि सर्वात महत्त्वाचं ती अजूनही माणूस आहे. ती टिकून आहे, पण प्रश्न समाजासमोर उभा आहे. या मोनालीसारख्यांसाठी न्याय कुठे आहे ?