नागपूरचे मितेश रांभिया यांचा ८६० किमी अंतर १५ दिवसांत धावण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 22:56 IST2017-12-07T22:53:37+5:302017-12-07T22:56:58+5:30
अनुभवी धावपटू मितेश रांभिया यांनी ‘अवयव दान करा, आयुष्य वाचवा’ असा संदेश देत मुंबई ते नागपूर हे ८६० किमी अंतर १५ दिवसांत धावण्याचा संकल्प सोडला आहे.

नागपूरचे मितेश रांभिया यांचा ८६० किमी अंतर १५ दिवसांत धावण्याचा निर्धार
आॅनलाईन लोकमत
नागपूर: अनुभवी धावपटू मितेश रांभिया यांनी ‘अवयव दान करा, आयुष्य वाचवा’ असा संदेश देत मुंबई ते नागपूर हे ८६० किमी अंतर १५ दिवसांत धावण्याचा संकल्प सोडला आहे. नागपूर रनर्स अकादमीचे संस्थापक असलेले रांभिया यांची ही मोहीम १६ ते ३० डिसेंबर अशी चालेल.
असा उपक्रम करणारे रांभिया हे विदर्भातील पहिले व्यक्ती असल्याची माहिती आयएमए अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत यांनी पत्रकारांना दिली. त्यांच्या उपक्रमात आयएमए मार्गात निवासाची आणि वैद्यकीय सेवेची व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमाची तयारी गेली सहा महिने सुरू असून उपक्रमादरम्यान शंकर भावसार आणि भूषण बरगट हे सहाय्य करतील.
राष्ट्रीय टेबल टेनिसपटू राहिलेले मितेश यांनी राष्ट्रीय दर्जाच्या अनेक कार रॅलीत भाग घेतला आहे. याशिवाय २५ पेक्षा अधिक मॅरेथॉन शर्यतीत धावले. गेल्या दोन वर्षांपासून ते स्वत: शहरात मॅरेथॉनचे आयोजन करीत आहेत. पत्रकार परिषदेला आयएमए उपाध्यक्ष डॉ.संजय देशपांडे, डॉ. सत्कार पवार, डॉ. वाय. एस. देशपांडे आदी उपस्थित होते.