लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी सकाळपासून उपद्रवी मंडळींकडून संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहून पोलिसांनी कडक धोरण अवलंबिल्यामुळे आज मंगळवारी त्याचे चांगले परिणाम नागपुरात दिसून आले. रस्ते, गल्लीबोळात संचारबंदीची सूचना देत फिरणाऱ्या पोलिसांच्या गाड्या आणि चौकाचौकात दिसणारे पोलीस.
निर्मनुष्य रस्ते अन् वस्त्यांमध्ये सामसूम. त्यातल्यात्यात किराणा आणि भाजीच्या दुकानात दिसणारी थोडी फार मंडळी अन् कारण नसताना रस्त्यावर आलेल्यांची पोलिसांकडून होत असलेली चौकशी, असे आज मंगळवारचे उपराजधानीचे चित्र होते.
कारवाईचे स्वरूप!शनिवार १४ मार्च ते मंगळवार २४ मार्च दुपारी ४ वाजेपर्यंत शहर पोलिसांनी नागपुरात एकूण ४२६ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, कलम १८८ च्या मनाईआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१८ गुन्हे दाखल करून ३,७७५ लोकांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी १६६२ चालान कारवाई केली.मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी संचारबंदीच्या संबंधाने कडक धोरण अवलंबिले. मंगळवार २४ मार्च दुपारी ४ वाजेपर्यंत शहर पोलिसांनी नागपुरात एकूण ६ गुन्हे दाखल केले. ३६६ जणांना ताब्यात घेतले तर, नाकाबंदी दरम्यान ३८७ वाहनचालकांवर चालान कारवाई करण्यात आली. या आकडेवारीसह शनिवार १४ मार्च ते मंगळवार २४ मार्च दुपारी ४ वाजेपर्यंत नागपुरात एकूण ४२६ व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले. कलम १८८ च्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४१८ गुन्हे दाखल करून ३७७५ लोकांना ताब्यात घेण्यात आले. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या चालान कारवाईचा आकडा १६६२ वर पोहचला.अडचण असेल तर पोलिसांना फोन कराशहरात संचारबंदी, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक काम असले आणि काही अडचण, समस्या किंवा कोणता प्रश्न निर्माण झाला असेल किंवा कोणती माहिती सूचना द्यायची असेल तर नागरिकांनी नागपूर शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉटस्अॅप नंबर ९०११३८७१०० या क्रमांकावर शेअर करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बुधवारी अधिक कडक होणार संचारबंदीसोमवारच्या तुलनेत मंगळवारी नागपुरातील संचारबंदी कडक राहिली. बुधवारी ती अधिक कडक होणार आहे. मात्र, जीवनावश्यक चिजवस्तू, औषधे, दूध, भाजीपाला आणि फळांची दुकाने मात्र सुरू राहणार आहे. त्यामुळे कुणाचीही गैरसोय अथवा कुचंबणा होणार नाही. त्यामुळे बुधवारी सकाळपासून विनाकारण कुणी घराबाहेर पडल्यास पोलिसांचे दंडुके आणि कायदेशीर कारवाई अशा दुहेरी कारवाईचा सामना संबंधित व्यक्तीला करावा लागू शकतो, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.