बलात्काराच्या आरोपीला तुरुंगात चांगली वागणूक देण्याचा दावा; वकिलाला न्यायालयाने फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 14:45 IST2026-03-12T14:44:45+5:302026-03-12T14:45:31+5:30
Nagpur : वकिली हा महान व्यवसाय असून, त्याची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे आद्यकर्तव्य आहे. वकिलांकडून अत्यंत प्रामाणिकपणा आणि निष्ठा अपेक्षित आहे. त्यामुळे वकिलांनी पक्षकारांना आर्थिकदृष्ट्या लुटण्याचा प्रयत्न करू नये.

Court reprimands lawyer for claiming good treatment of rape accused in jail
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वकिली हा महान व्यवसाय असून, त्याची प्रतिष्ठा जपणे वकिलांचे आद्यकर्तव्य आहे. वकिलांकडून अत्यंत प्रामाणिकपणा आणि निष्ठा अपेक्षित आहे. त्यामुळे वकिलांनी पक्षकारांना आर्थिकदृष्ट्या लुटण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी पक्षकारांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वोत्तम कायदेशीर प्रयत्न करायला हवेत, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील अॅड. सचिन वानखेडे यांनी त्यांच्याविरोधातील लाचलुचपत एफआयआर व खटला रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाला त्यांचे कृत्य वकिली व्यवसायाच्या तत्त्वांना अनुरूप नसल्याचे आढळून आले. न्यायालयाने वकील व वकिली व्यवसायावर महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करून ही याचिका फेटाळून लावली. वकिली एक महान व आव्हानात्मक व्यवसाय आहे. वकील न्यायालयाचे अधिकारी असतात. त्यांना सन्माननीय सदस्य म्हणून संबोधले जाते. त्यामुळे त्यांनी हा दर्जा सांभाळून वागले पाहिजे. पक्षकारांच्या अधिकारांचे प्रामाणिकपणे संरक्षण केले पाहिजे. वाद सोडविण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधले पाहिजे. वकिलांशी संपर्क साधल्यानंतर आपल्या समस्या सुटतील, अशी भावना पक्षकारांमध्ये निर्माण झाली पाहिजे. वकिलांमुळे त्यांच्या समस्या वाढायला नको, असेही न्यायालय निर्णयात म्हणाले.
..असे आहे प्रकरण :
मूर्तिजापूर पोलिसांनी तक्रारकर्ते राजेश कांबे यांच्या मुलाला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यामुळे कांबे यांनी अॅड. वानखेडे यांची सेवा घेतली होती. दरम्यान, वानखेडे यांनी मुलाला पोलिस ठाण्यात चांगली वागणूक मिळवून देण्यासाठी एक ते सव्वा लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप आहे.