नागपूर : मार्च महिन्यात राज्यात पोहोचलेल्या कोरोनाचा सर्वात पहिला फटका शिक्षण क्षेत्राला बसला. ऐन परीक्षेच्या तोंडावर राज्यातील शाळा बंद करण्याचे सरकारने निर्देश दिले. पुढच्या महिन्यात शाळा बंद होण्याला तब्बल वर्ष होत आहे. या वर्षभरात शिक्षण क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग झाले. शिक्षण वर्गातच नाही, तर घरात बसूनही घेता येऊ शकते, हे दाखवून दिले. परीक्षेविनाच विद्यार्थी पास झाले. पहिल्यांदाच विदर्भातील शाळा २६ जून रोजी सुरू होऊ शकल्या नाही.
१८ मार्च, २०२० पासून राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या. विशेष म्हणजे, हा काळ परीक्षेचा होता. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या काळात सुरू होत्या. कशाबशा या परीक्षा आटोपल्या, पण इतर वर्गाच्या परीक्षा २०२०-२१ या सत्रात होऊ शकल्या नाही. कोरोनाचा विळखा हळूहळू वाढत असताना सरकारने लॉकडाऊन घोषित केले. अशात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून एप्रिल, २०२० मध्ये ‘लर्निंग फ्रॉम होम’ ही संकल्पना राबविली. एप्रिल, मे हे महिने लॉकडाऊनमध्ये निघाल्यानंतर जून महिन्यापासून पुन्हा शाळांच्या तयारीला शासन लागले. १५ जून, २०२०ला शाळा ऑनलाइन, ऑफलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितींच्या बैठका घेण्याचे निर्देश दिले. सोबतच मुलांच्या स्वयं अध्ययनावर भर देताना ऑनलाइन, डिजिटल शिक्षणाचा पर्याय पुढे आला. २२ जुलै रोजी शाळा सुरू करण्यासंदर्भात सुधारित सूचना सरकारने दिल्या. ऑनलाइन अभ्यासक्रमात अडचणी असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही, असे शिक्षण विभागाच्या लक्षात आल्याने २४ जुलै, २०२० रोजी पहिली ते बारावीच्या २५ टक्के अभ्यासक्रमात कपात केली. मार्च महिन्यापासून शाळा बंद असतानाही ऑगस्ट महिन्यात शालेय पोषण आहाराचे वितरण विद्यार्थ्यांना केले.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या मूल्यांकनापासून, निकालापर्यंतची प्रक्रिया चांगलीच गुंतागुंतीची ठरली. निकाल कधी लागतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर जुलै महिन्याच्या शेवटी निकाल जाहीर झाले.
शाळा बंद असल्याने, काही शिक्षकांची जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या विविध कामांत सेवा घेतली होती, तर काही शिक्षक घरीच असल्याने, २९ ऑक्टोबर, २०२० रोजी शिक्षकांच्या ५० उपस्थितीबाबत निर्णय घेण्यात आल्या. ऑक्टोबरनंतर कोरोनाचा प्रकोप राज्यभरातच काहीसा कमी झाल्याने, शालेय शिक्षणमंत्र्यांनी २६ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी २६ नोव्हेंबरला शाळा सुरू केल्या, पण महापालिका आयुक्तांनी १३ डिसेंबरनंतर ९वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश दिले.
९वी ते १२वीचे वर्ग सुरळीत चालत असल्यामुळे २७ जानेवारीपासून ५वी ते ८वी वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जानेवारीला शाळा सुरू केल्या. मात्र, महापालिका आयुक्तांनी ८ फेब्रुवारीनंतर वर्ग ५वी ते ८वी सुरू केले. कसेबसे ५वी ते १२वीचे वर्ग सुरू झाले असताना, आठवड्याभरापासून कोरोनाचा कहर जिल्ह्यात पुन्हा वाढला. शाळेच्या विद्यार्थ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार, ७ मार्चपर्यंत जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षणाचे वर्ग सुरू होऊ शकले नाहीत. भविष्यात कोरोनाची स्थिती लक्षात घेता, पुढच्या शैक्षणिक सत्रातच पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांचे भविष्य निर्भर आहे.