"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:52 IST2025-06-28T12:50:33+5:302025-06-28T12:52:13+5:30
भारताचे सरन्यायाधीश गवई हे एका कार्यक्रमात त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल सांगताना भावुक झाले.

"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
CJI BR Gavai: भारताचे नवे सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे एका कार्यक्रमात भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. सरन्यायाधीश त्यांचे वैयक्तिक अनुभव आणि त्यांच्या पालकांच्या संघर्षांबद्दल सांगत होते. यादरम्यान त्यांचे डोळे पाणावले आणि त्यांचा आवाज जड झाला. मला लहानपणापासूनच वास्तुतज्ज्ञ व्हायचे होते, पण माझ्या वडिलांचे स्वप्न वेगळे होते, असं सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. वडिलांच्या आठवणी सांगताना भूषण गवई यांना यांना अश्रू अनावर झाले.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई हे त्यांच्या आयुष्याशी संबंधित वैयक्तिक अनुभव सांगत भावनिक झाले. नागपूर जिल्हा न्यायालय बार असोसिएशनने त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी त्यांच्या पालकांच्या संघर्षांचा आणि त्यांच्या वडिलांच्या आकांक्षांनी त्यांच्या जीवनाची दिशा कशी बदलली हे सांगितले. मला आर्किटेक्ट व्हायचे होते, पण वडिलांना मला वकील बनवायचे होते, अशी आठवण सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले. हे सांगताना सरन्यायाधीश भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
"माझ्या वडिलांना वकील व्हायचे होते, पण स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आणि ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. माझ्या वडिलांनी स्वतःला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सेवेसाठी समर्पित केले होते. आम्ही एका संयुक्त कुटुंबात राहत होतो आणि सर्व जबाबदारी माझ्या आई आणि काकूंवर होती. माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वास्तुतज्ज्ञ होण्याचे स्वप्न सोडले," असं सरन्यायाधीश गवई म्हणाले.
"जेव्हा उच्च न्यायालयात न्यायाधीश पदासाठी माझ्या नावाची शिफारस करण्यात आली तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं की जर तू वकील राहिलात तर फक्त पैशाच्या मागे धावशील, पण जर तू न्यायाधीश झालास तर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करशील. समाजाचे भले कराल. माझे वडील नेहमी म्हणायचे की माझा मुलगा या देशाचा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी राहणार नाही. २०१५ मध्ये आम्ही त्यांला गमावले. आज त्यांची उपस्थिती प्रकर्षाने जाणवते. पण मला आनंद आहे की माझी आई अजूनही आमच्यात आहे," असेही सरन्यायाधीशांनी म्हटलं.