समलैंगिकांसमोर एड्सचा सामना करण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:42 IST2018-10-04T00:40:38+5:302018-10-04T00:42:38+5:30
देशात एचआयव्ही-एड्सचे प्रमाण कमी होत असताना समलैंगिक व एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये मात्र हे प्रमाण वाढत आहे. विशेषत: १५ ते २४ या वयोगटातील आकडेवारी चिंतित करणारी आहे. त्यामुळे समलैंगिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असला तरी भविष्याचा विचार होणे आवश्यक आहे. समाजाची मान्यता व एड्सशी सामना हे समलैंगिकांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिलिंद भृशुंडी यांनी व्यक्त केले. नागपूर प्रेस क्लबतर्फे बुधवारी, समलैंगिकता, बदलता दृष्टिकोन, सर्वोच्च न्यायालय व समाज, या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.

समलैंगिकांसमोर एड्सचा सामना करण्याचे आव्हान
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात एचआयव्ही-एड्सचे प्रमाण कमी होत असताना समलैंगिक व एलजीबीटीक्यू कम्युनिटीमध्ये मात्र हे प्रमाण वाढत आहे. विशेषत: १५ ते २४ या वयोगटातील आकडेवारी चिंतित करणारी आहे. त्यामुळे समलैंगिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला असला तरी भविष्याचा विचार होणे आवश्यक आहे. समाजाची मान्यता व एड्सशी सामना हे समलैंगिकांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिलिंद भृशुंडी यांनी व्यक्त केले. नागपूर प्रेस क्लबतर्फे बुधवारी, समलैंगिकता, बदलता दृष्टिकोन, सर्वोच्च न्यायालय व समाज, या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.
प्रेस क्लब सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी होते. त्याचप्रमाणे आमदार. डॉ. मिलिंद माने, सारथी ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी निकुंज जोशी, किन्नर समाजाच्या विद्या कांबळे, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र हे देखील उपस्थित होते. अनेक समलैंगिक अद्यापही जाहीरपणे समोर आलेले नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आकडेवारीनुसार देशात २५ लाख ‘गे’ लोक आहेत. यातील ७ टक्के लोकांना एड्स आहे. प्रत्यक्षात हे प्रमाण आणखी जास्त असू शकते. जागतिक बँकेच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील १३ टक्के ‘गे’ लोकांमध्ये एड्सचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या मुद्याकडे गंभीरतेने लक्ष दिले गेले पाहिजे, असे डॉ. भृशुंडी म्हणाले. समलैंगिकांकडे नेहमीच वाईट दृष्टीने पाहिले गेले आहे. मात्र आता यासंदर्भात जागृती करण्याची गरज आहे. समलैंगिकांनी देखील स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे, असे डॉ.मिलिंद माने म्हणाले.
एलजीबीटीक्यू समुदायाने स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, असा सल्ला गिरीश गांधी यांनी दिला. तृतीयपंथीयांसाठी स्वखर्चाने प्रसाधनगृह बांधून देण्याची तयारी देखील त्यांनी दाखविली.
समलैंगिकाच्या मुद्याला समाजाने समजून घेतले पाहिजे. यासाठी शिक्षण प्रणालीत योग्य धडे दिले गेले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लैंगिक शिक्षणावर भर दिला गेला पाहिजे, असे प्रतिपादन निकुंज जोशी यांनी केले. प्रदीप मैत्र यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा बासू यांनी केले.