दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे शिक्षण मंडळाला पत्र
By निशांत वानखेडे | Published: January 13, 2024 07:14 PM2024-01-13T19:14:38+5:302024-01-13T19:15:01+5:30
राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचा रिक्त जागा असून २०१२ पासून भरती प्रक्रिया झालेली नाही.
![Boycott warning on 10th, 12th exams Education Corporation's letter to Board of Education | दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे शिक्षण मंडळाला पत्र Boycott warning on 10th, 12th exams Education Corporation's letter to Board of Education | दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे शिक्षण मंडळाला पत्र](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/ssc-hsc_2024011157475.jpg)
दहावी, बारावीच्या परीक्षांवर बहिष्काराचा इशारा; शिक्षणसंस्था महामंडळाचे शिक्षण मंडळाला पत्र
नागपूर: अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शालेय शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यावर्षी फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या इयत्ता दहावी, बरावीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने दिला आहे. यासंदर्भातील पत्र नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधुरी सावरकर यांना देण्यात आले.
राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचा रिक्त जागा असून २०१२ पासून भरती प्रक्रिया झालेली नाही. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा प्रश्न प्रलंबित आहे. वेतनेतर अनुदानासंबंधीची भूमिका याबाबत निर्णय न झाल्याने शाळांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. असे प्रश्न त्वरित मार्गी लावावे अन्यथा १० वी, १२ वीच्या परीक्षांवर बहिष्कार घालण्यात येईल, असे महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी महामंडळाचे नागपूर विभाग अध्यक्ष प्रा. अनिल शिंदे, कार्यवाह किशोर मासुरकर व राज्य कार्यकारिणी सदस्य अतुल घुडगे, आल्हाद भांडारकर यांची उपस्थिती हेाती.