आरएसएसच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चाचा नागपुरात एल्गार; संविधान चौकात जाहीर सभा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 19:07 IST2026-02-22T19:07:29+5:302026-02-22T19:07:49+5:30
दुपारी १२ वाजता इंदोरा मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली. दरम्यान आरएसएसच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा संविधान चौकात पोहोचला. या मोर्चात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय बेरोजगार युवा संघटना, राष्ट्रीय भीमसेना, भारतीय विद्यार्थी संघटना आदींचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

आरएसएसच्या विरोधात भारत मुक्ती मोर्चाचा नागपुरात एल्गार; संविधान चौकात जाहीर सभा
नागपूर : भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात रविवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात नागपुरात भव्य रॅली काढण्यात आली.
बामसेफचे ४५ वे आणि भारत मुक्ती मोर्चाचे १५ वे राष्ट्रीय अधिवेशन २६ डिसेंबर रोजी ओडिशामधील कटक येथील बाली यात्रा मैदानावर होणार होते. अधिवेशनासाठी शासन व प्रशासनाकडून प्राथमिक परवानग्या मिळाल्यानंतर मंडप व इतर सुविधांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. देशभरातून शेकडो कार्यकर्ते कटक येथे पोहोचले होते. मात्र, ऐनवेळी स्थानिक प्रशासनाने परवानग्या रद्द केल्याने अधिवेशन होऊ शकले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या दबावामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप मेश्राम यांनी केला. ही कृती भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असून या कृत्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे.
दुपारी १२ वाजता इंदोरा मैदान येथून मोर्चाला सुरूवात झाली. दरम्यान आरएसएसच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा संविधान चौकात पोहोचला. या मोर्चात राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी, भारतीय बेरोजगार युवा संघटना, राष्ट्रीय भीमसेना, भारतीय विद्यार्थी संघटना आदींचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधान चौकात झालेल्या मुख्य सभेस व्यासपीठावर वामन मेश्राम यांच्यासह दादाराव नायक, दिशा मेश्राम, श्रीधर सांबरे, सिदर्धार्थ मौर्य, संदीप मानकर आदी उपस्थित होते.
सरकार घाबरले -
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लुडबूडीला विरोध हा भारत मुक्ती मोर्चाच्या महारॅलीचा मुळ उद्देश होता. असे असताना महारॅलीला आधी दिलेली परवानगी एन वेळी नाकारणे म्हणजे महारॅलीला सरकार घाबरले हे सिद्ध करणारे आहे. महारॅलीचा उद्देश सफल झाला आहे. पोलिसांना पुढे करून सरकारने अप्रत्यक्षपणे हे मान्य केले आहे.
-वामन मेश्राम, राष्ट्रीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा
आरएसएस मुख्यालयापर्यंत रॅलीची परवानगी नाकारली, पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त
सुरूवातीला हा मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर काढण्यात येणार होता. परंतु पोलिसांनी त्याला परवानगी नाकारली. संविधान चौकापर्यंत रॅलीला परावनगी देण्यात आली. त्यामुळे इंदोरा मैदानावरून हा मोर्चा संविधान चौकापर्यंत काढण्यात आला. या दरम्यान सकाळपासूनच इंदोरा मैदान आणि संविधान चौकात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सिव्हील ड्रेसमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते. यासोबतच इंदोरा मैदान ते संविधान चौकापर्यंत आणि झिरो माईल रेल्वे स्टेशन चौक दरम्यान जागोजागी पोलिस तैनात होते.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या -
- कटक येथे रद्द करण्यात आलेल्या अधिवेशनास पुन्हा परवानगी द्यावी
- ओबीसींसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करावी
- सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घ्याव्यात
- संविधानिक मूलभूत अधिकारांचे संरक्षण करावे
- रद्द अधिवेशनामुळे झालेल्या खर्चाची भरपाई द्यावी
- ओडिशा सरकारवर संविधानविरोधी कृतीबाबत कारवाई करावी