"जर ब्लॅक बॉक्समधून काहीही निष्पन्न होत नसेल, तर ‘दाल में ..."; अजितदादांच्या विमान अपघातावर काँग्रेस नेत्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 12:41 IST2026-02-17T12:38:34+5:302026-02-17T12:41:37+5:30
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या अपघात प्रकरणावर आता संशय व्यक्त केला जात आहे.

"जर ब्लॅक बॉक्समधून काहीही निष्पन्न होत नसेल, तर ‘दाल में ..."; अजितदादांच्या विमान अपघातावर काँग्रेस नेत्याचा संशय
Ajit Pawar Plane Crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी दररोज नवीन माहिती समोर येत आहे. आमदार रोहित पवार यांनी विमान अपघातावर संशय व्यक्त केला. दरम्यान, काल विमानातील ब्लॅक बोक्स जळाल्याची माहिती समोर आली. यावर आता काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.
विजय वडेट्टीवार यांनी गंभीर शंका व्यक्त केली. “अजित पवारांचा मृत्यू हा केवळ अपघात वाटत नाही. राज्यात आणि देशभरात घातपाताची चर्चा झाली. त्यातच विमानाचा ब्लॅक बॉक्स खराब झाल्याची माहिती समोर आली. जर ब्लॅक बॉक्समधून काहीही निष्पन्न होत नसेल, तर ‘दाल में कुछ तो काला है’ असे म्हणावे लागेल,” असे वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले, अपघाताच्या चौकशीबाबत पारदर्शकता ठेवण्याची मागणी करत, सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली. यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, कोणाला अध्यक्ष नेमावा, कोणाला काय करावं, हा त्या पक्षाचा निर्णय आहे. आम्हाला आनंद आहे की एक महिला एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होत असतील आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.
पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट कशी दिली, याचा खुलासा सरकारने करावा. एवढा मोठा व्यवहार सामान्य व्यक्ती करूच शकत नाही. या प्रकरणामागे मोठ्या लोकांचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही. जो भाजपसोबत आहे तोच स्वच्छ ठरतो. कितीही मोठा घोटाळा केला तरी शिक्षा होत नाही, हे अनेक घटनांतून स्पष्ट झाले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. अल्पसंख्याक आयोगाच्या शाळा प्रमाणपत्रावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, "हे मंत्रालयातील लोकं टाळूवरील लोणी खाणारे दु:खद घटनेमध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यू झालेला आहे. अशा वेळेस परवानगी देणारे, हे महाभाग कोण आहेत, अशा महाभागांना शोधून कारवाई केली पाहिजे.