नेहरू, इंदिरांनंतर आता भाजप नेत्यांचे संजय गांधींवर टीकास्त्र
By योगेश पांडे | Updated: June 20, 2025 15:52 IST2025-06-20T15:51:35+5:302025-06-20T15:52:37+5:30
आणीबाणीत मनमानी केल्याचा आरोप : भाजप मिसाबंदींचा करणार सन्मान

After Nehru and Indira, now BJP leaders criticize Sanjay Gandhi
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून भाजप नेत्यांकडून सातत्याने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तसेच इंदिरा गांधी यांच्याविरोधात वक्तव्ये करण्यात येत आहेत. मात्र आता भाजप नेत्यांनी इंदिरा गांधी यांचे दिवंगत पुत्र संजय गांधी यांच्यवरदेखील टीकास्त्र सोडले आहे. आणीबाणीच्या कालावधीत संजय गांधी व त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांनी देशात दहशत निर्माण करून मनमानीचा कारभार केल्याचा आरोप भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास व नागपुरचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी लावला.
शुक्रवारी नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते. १९७५ मध्ये देशात लादलेल्या आणीबाणीला २५ जून रोजी ५० वर्षे पूर्ण होतील. आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या हजारो लोकांना तुरुंगात टाकले होते, ज्यात विरोधी पक्षाचे नेतेही होते. आणीबाणी लोकशाहीतील काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. यात संजय गांधी यांची मोठी भूमिका होती. त्यांनी जबरदस्तीने देशातील अनेक अविवाहित तरुणांचीदेखील नसबंदी केली होती. कॉंग्रेसचे नेते आता संविधान बचावची भाषा करतात. मात्र प्रत्यक्षात कॉंग्रेस पक्षानेच आणीबाणीच्या काळात संविधानाची गळचेपी करण्याचे काम केले होते. नवीन पिढीपर्यंत कॉंग्रेसचा हा खरा चेहरा व आणीबाणीची दाहकता आणण्यावर आमचा भर असेल असेल तिवारी यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून २५ जून रोजी आणीबाणीच्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या मिसाबंदींचा सन्मान केला जाईल. हा सन्मान केवळ औपचारिकता नाही, तर त्यांच्या संघर्ष आणि बलिदानाची स्मृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आहे, असे भाजप नेत्यांनी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार अनिल सोले, मिलींद माने, विकास कुंभारे, अर्चना डेहनकर, अश्विनी जिचकार, प्रामुख्याने उपस्थित होते.