तीन फेऱ्यांमध्ये मिळालेल्या पसंतीच्या कॉलेजमध्येच घ्यावा लागेल प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 16:03 IST2025-06-26T15:59:59+5:302025-06-26T16:03:03+5:30

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल : तीनऐवजी होणार चार प्रवेश फेऱ्या

Admission will have to be taken only in the college of choice received in three rounds. | तीन फेऱ्यांमध्ये मिळालेल्या पसंतीच्या कॉलेजमध्येच घ्यावा लागेल प्रवेश

Admission will have to be taken only in the college of choice received in three rounds.

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राज्यात सीईटीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही. दरम्यान तंत्रशिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेत काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये मिळालेले अनुक्रमे एक, तीन किंवा सहा पैकी कोणतेही पसंतीच्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असेल.


उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बदलांबाबत अधिसूचना जारी केली आहे. वरील नियम राज्यभरातील विनाअनुदानित, खासगी व्यावसायिक संस्थांमधील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागू राहतील. यावेळी प्रक्रियेत तीन ऐवजी चार कॅप राउंड होतील.


चौथ्या फेरीनंतर कोणतीही सुधारणा होणार नाही. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहिती सीईटी सेलच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तसेच, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्याची किंवा मागील फेरीत भरलेले ऑप्शन बदलण्याची संधी मिळेल. जर अर्जाच्या वेळी विद्यार्थ्याने पसंत केलेल्या महाविद्यालयाच्या पसंतीनुसार पहिल्या यादीतील पहिले महाविद्यालय, दुसऱ्या यादीतील पहिले तीन महाविद्यालय आणि तिसऱ्या यादीतील पहिल्या ६ महाविद्यालयात सीट मिळाली, तर प्रवेश निश्चित मानला जाईल.


हे विद्यार्थी पुढील फेरीसाठी पात्र राहणार नाहीत. म्हणजेच या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे अनिवार्य असेल. याशिवाय, चार फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेऱ्या घेतल्या जातील. त्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. जर या फेरीत संस्थेने अर्ज नाकारला तर विद्यार्थी सीईटी सेलच्या वेबसाइटवर अर्ज करू शकतील.


कॉलेज कोट्याच्या प्रवेशासाठी भरावे लागेल तीनपट शुल्क
कॉलेज कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संस्था निर्धारित शुल्काच्या तीन पट अधिक शुल्क आकारू शकते. तर, अनिवासी भारतीय कोट्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून पाच पट अधिक शुल्क आकारले जाऊ शकते. चारही फेऱ्याची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थात्मक कोट्याची घोषणा केली जाईल. विद्यार्थी चारही फेऱ्यांमध्ये संस्थात्मक कोट्याच्या जागांसाठी अर्ज करू शकतात. संस्थांना या फेरीची प्रक्रिया देखील गुणवत्तेच्या आधारे पूर्ण करावी लागेल. संस्थांना वेबसाइटवर गुणवत्ता यादी प्रकाशित करणे बंधनकारक असेल.

Web Title: Admission will have to be taken only in the college of choice received in three rounds.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.