७०० ग्रॅमच्या जीवाने १०० दिवसांच्या संघर्षानंतर मिळविला मृत्यूवर विजय; मेडिकलच्या 'देवदूतांनी' दिले नवजीवन
By सुमेध वाघमार | Updated: March 10, 2026 17:23 IST2026-03-10T17:16:50+5:302026-03-10T17:23:37+5:30
Nagpur : नियतीचा खेळ कधी कधी इतका कठोर असतो की, जन्माला येण्यापूर्वीच एका इवल्याशा जिवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते.

A 700 gram life defeated death after a 100-day struggle; Medical 'angels' gave it a new lease of life
नागपूर : नियतीचा खेळ कधी कधी इतका कठोर असतो की, जन्माला येण्यापूर्वीच एका इवल्याशा जिवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहते. पण जिथे विज्ञानाची साथ आणि डॉक्टरांचे समर्पण असते, तिथे चमत्कार घडतातच. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) असाच एक 'वैद्यकीय चमत्कार' घडला आहे. केवळ ७०० ग्रॅम वजन आणि अवघ्या २६ आठवड्यांच्या गर्भावस्थेत जन्मलेल्या इवल्याश्या जिवाने तब्बल १०० दिवसांच्या संघषार्नंतर मृत्यूला चकवा देत नवे आयुष्य प्राप्त केले.
नऊ महिने पूर्ण होण्याआधीच, केवळ सहाव्या महिन्यात या बाळाचा जन्म झाला. जन्मत:च त्याचे वजन एका पाण्याच्या बाटलीपेक्षाही कमी (७०० ग्रॅम) होते. फुफ्फुसे पूर्ण विकसित न झाल्याने 'रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम'मुळे या जिवाला श्वास घेणेही कठीण झाले होते. ११ दिवस व्हेंटिलेटर आणि १० दिवस 'सी-पॅप' मशीनच्या आधारावर या बाळाचा श्वासोच्छ्वास सुरू होता. प्रत्येक क्षण त्या माऊलीसाठी आणि डॉक्टरांसाठी परीक्षेचा होता. या १०० दिवसांच्या प्रवासात या चिमुकल्यासमोर संकटांचा डोंगर उभा होता. कधी रक्तातील संसर्ग (सेप्टिसेमिया), तर कधी आतड्यांची गंभीर समस्या. इतकेच नाही, तर या काळात बाळाला डोळ्यांच्या व्याधीने आणि जन्मजात हृदयविकारानेही घेरले होते. मात्र, मेडिकलच्या 'एनआयसीयू' विभागातील डॉक्टरांनी हार मानली नाही. डॉ. आशिष लोथे, डॉ. संदीप मानवटकर आणि त्यांच्या टीमने अहोरात्र मेहनत घेऊन या संकटांवर मात केली.
परिचारिकांच्या मायेने दिले बळ
ज्या बाळाचे अस्तित्व धोक्यात होते, ते बाळ आज १ किलो ८८० ग्रॅम वजनाचे होऊन हसत-खेळत आपल्या आईच्या कुशीत विसावले आहे. डोळ्यांची दृष्टी सुरक्षित आहे आणि हृदयाचे ठोकेही आता सामान्य आहेत. परिचारिकांनी या बाळावर घेतलेले विशेष मेहनत आणि डॉक्टरांच्या कौशल्याने या बाळाला नवे जीवन मिळण्यास बळ मिळाले.
अधिष्ठात्यांसह टिमचे बाळाला वाचविण्याचे प्रयत्न
हा केवळ एक उपचार नव्हता, तर आमच्या संवेदनशीलतेची आणि शासकीय आरोग्य व्यवस्थेच्या क्षमतेची ही एक मोठी परीक्षा होती. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या संपूर्ण टीमने या बाळाला वाचवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. हे खºया अर्थाने देवतूत ठरल्याचे बालरोग विभाग प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले.
शासकीय रुग्णालयाने जपली 'माणुसकी'
खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करूनही जे शक्य होत नाही, ते मेडिकलच्या डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी माणुसकी जपत आपल्या सेवाभावातून करून दाखवले. आज जेव्हा हे बाळ सुखरूप घरी परतले, तेव्हा वॉर्डातील डॉक्टरांसह, परिचारिका व कर्मचाºयांच्या चेहºयावर समाधानाचे भाव होते.