शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

..यंदा गुलाल, भंडारा, खोबरं दणक्यात हाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 07:00 IST

लॉकडाऊनच्या गाळात रुतलेली गावं जागी झालीत, जत्रा-यात्रा-उरुसांनी मोहरू लागलीत! मनाचं पाखरू झालेले चाकरमानी गावाकडं निघालेत...

लॉकडाऊनच्या गाळात रुतलेली गावं जागी झालीत, जत्रा-यात्रा-उरुसांनी मोहरू लागलीत! मनाचं पाखरू झालेले चाकरमानी गावाकडं निघालेत...

कोरोनाच्या कचाट्यातून सुटून दोन वर्षांनंतर यंदा गावोगावच्या यात्रा-जत्रा-उरूसांना दणक्यात सुरुवात झालीय. लॉकडाऊनच्या गाळात रुतलेला गावगाडा भिरीरी पळायला लागलाय. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या तोंडावर तजेला आलाय...

सुगी संपली की, लगेच सुरू होतो यात्रा-जत्रा-उरूसांचा हंगाम. यात्रा-जत्रा म्हणजे लोकजीवनाचं सांस्कृतिक वैशिष्ट्य. हा जसा देव-देवतांचा, सत्पुरुषांचा, नद्या-डोंगरांचा उत्सव, तसा कृषी संस्कृतीचा लोकोत्सव, आनंदसोहळा, एकोप्याचा धडा गिरवून घेणारा. पंचेंद्रियांची दिवाळीच! सगळे नाद, स्वाद, रंग, गंध इथं सामावलेले. दिवसभर राबणं खेड्यातल्या प्रत्येकाच्या पाचवीला पूजलेलं. बारोमास कष्ट. या सगळ्या बाया-बापड्यांना राबण्यातून सुटका मिळते, ती जत्रा-यात्रांच्या निमित्तानं. ग्रामीण संस्कृती आणि परंपरांची जपणूक होते, ती इथंच. काहीबाही विकणाऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळते आणि गावकुसातल्या कलावंतांना लोकाश्रय मिळतो, तोही इथंच.

खरं तर गावोगावच्या जत्रांचे वेध सुगी संपण्याआधीच लागतात. शेत-शिवारात पिकांच्या काढणीला जोर आलेला असतो. त्यात शेतकरी, शेतमजुरांची नुसती लगबग. त्याच उत्साही वातावरणात यात्रांची तयारी सुरू होते. तारीख ठरते शेतीच्या वेळापत्रकावर. घाटावरच्या यात्रा-जत्रा ठराविक तिथीलाच येतात, तर कोकणात तारखेसाठी कौल लावतात. काही यात्रा-जत्रा खरीप हंगामानंतर, तर बहुसंख्य सोहळे त्या-त्या भागातली वर्षाची सुगी संपल्यानंतर. उरूस मुस्लिम कॅलेंडरवर ठरतात. 

गावची जत्रा म्हटलं की, माहेरवाशिणी, नोकरी-व्यवसायासाठी बाहेरगावी असलेल्या गावकऱ्यांचं मन पाखरू होतं. ते जत्रेसाठी गावाकडं पळतं. खेड्यांतली सुख-दु:खं जत्रांना लगडलेली. सगळे समाज, सगळं गाव यांना सोबतीला घेऊनच यात्रा-जत्रा फुलतात, बहरतात. पूर्वजांनी पाहुणे-रावळे, आप्तेष्ट, मित्रमंडळींना एकत्र करून मनं मोकळी करण्याच्या, सुख-दु:खं वाटून घेण्याच्या, गोडाधोडाचं खाऊपिऊ घालण्याच्या या लोकसोहळ्याला, बाजारपेठेच्या हंगामाला धार्मिक जोड दिलेली. त्यानिमित्तानं ग्रामदैवताबद्दलची अपार कृतज्ञता  व्यक्त करता येते... त्यातला नवस फेडण्याचा, तोरण वाहण्याचा, गुलाल-भंडारा-खोबरं उधळण्याचा, पालखी-मिरवणुका, दंडवतांचा उपचार म्हणजे तर आपल्यावर देव नावाच्या राखणदाराचा वरदहस्त आहे, याचा दिलासाच!

जत्रेतली बाजारपेठ अख्ख्या पंचक्रोशीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी देते. खेडोपाडी तयार होणाऱ्या वस्तूंना गिऱ्हाईक देते. हळद-कुंकू, गुलाल-बुक्का, देव-देवतांच्या तसबिरीपासून मोबाईलपर्यंत आणि बायकांच्या कंगव्या-टिकल्यांपासून दागदागिन्यांपर्यंत सगळं काही मिळण्याचं ठिकाण म्हणजे गावची जत्रा. लहान-थोरांना मोठमोठाले आकाशपाळणे, फिरती चक्रं, नानाविध वस्तू, खेळण्यांची दुकानं, भेंडबत्ताशापासून जिलबीपर्यंत, भज्यापासून शेव-चिवड्यापर्यंत सगळ्याचंच अप्रूप!

जत्रा म्हटलं की तंबूतला आणि पारावरचा तमाशा, कलापथकं, दशावतारी खेळ, टुरिंग टॉकिजमधले चित्रपट, कुस्त्यांचे फड, बैलगाड्यांच्या शर्यती, भजन-प्रवचनं हे आपसूकच आलं. गावा-गावातल्या पैलवान, लोककलावंत, छोट्या व्यावसायिकांना यातूनच बळ मिळतं. अवघ्या आनंदाचं साधंसुधं आभाळ जत्रेवर सावली धरून असतं. 

कोल्हापूरजवळचा जोतिबा, जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची तुळजाभवानी, कोकणातल्या आंगणेवाडीची भराडीदेवी, नांदेडच्या माळेगावचा खंडोबा, ठाण्याचा हाजीमलंग, नाशिकची सप्तशृंगी, सौंदत्तीची यल्लम्मा, माहुरगडची रेणुका, औंढ्याचा नागनाथ, परळीचा वैजनाथ, शिखर शिंगणापूरचा शंभुमहादेव, मांढरदेवची काळुबाई, पालीचा खंडोबा, पाटणजवळचा नाईकबा, सोलापूरचा सिद्धरामेश्वर, आरेवाडीचा बिरोबा, यासोबतच अहमदनगरचे कानिफनाथ, पुसेगावचे सेवागिरी यांच्या लोकोत्सवाला गर्दी उसळते. कुणाची यात्रा एक-दोन दिवसांची, तर कुणाची दहा-दहा दिवस चालणारी. कोणाचे नैवेद्य गोडे, तर कोणाचे खारे. कोणाच्या सासनकाठ्या, तर कोणाच्या पालख्या आणि रथोत्सव! 

बदलत्या काळात जत्रांचं स्वरूप बदललं, पण रूढी-परंपरांची जपणूक आणि नवतेचा ध्यास कायम. जत्रेला जाणाऱ्या घुंगरांच्या बैलगाड्यांसोबत जीपगाड्या-आरामबसही आल्या. मेवामिठाईच्या दुकानात शेव-चिवड्यासोबत चायनिज पदार्थांचीही रेलचेल झाली. हातानं फिरवल्या जाणाऱ्या चक्रीपाळण्यांसोबत डोकं गरगरवणारी आधुनिक चक्रं आली. पण चार-आठ दिवस एकत्र येऊन लोकसोहळा साजरा करण्याची विशुद्ध भावना तीच राहिली. हे भारलेपण टिकून असल्यानंच गाववाला गावची जत्रा कधी चुकवत नाही. जत्रेचं रंगीबेरंगी आयुष्य जमेल तसं पदरात बांधतो आणि पुढच्या वर्षीच्या तारखेची हुरहूर मनात ठेवत कामाला लागतो...- श्रीनिवास नागे, वृत्तसंपादक, लोकमत, सांगली