क्रिकेटचा अतिरेक अन् चुकलेले डावपेच, ...म्हणून थंडावला ‘आयपीएल’ज्वर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 12:46 PM2022-04-17T12:46:11+5:302022-04-17T12:47:02+5:30

भारतीय खेळाडूंची एवढी दमछाक यापूर्वी कधी झालेली नाही, ती आता होताना दिसतेय. त्याचा फटका आपल्याला आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बसलेला सर्वांनी पाहिलाय. त्यामुळे खेळाडूंचं प्रेम हे राष्ट्राशी नसून फ्रँचायझीवर अधिक आहे, असा एक संदेश चाहत्यांमध्ये गेलाय. तो काहीसा खराही आहे. 

Overabundance of cricket and Missed tactics, column about IPL | क्रिकेटचा अतिरेक अन् चुकलेले डावपेच, ...म्हणून थंडावला ‘आयपीएल’ज्वर!

क्रिकेटचा अतिरेक अन् चुकलेले डावपेच, ...म्हणून थंडावला ‘आयपीएल’ज्वर!

Next

स्वदेश घाणेकर -
सीनिअर कंटेंट एक्झिक्युटिव्ह लोकमत


कोरोना काळात दोन वर्ष भारताबाहेर झालेली इंडियन प्रीमिअर लीग अखेर यंदा मायदेशात परतली. कोरोनाचं संकट पूर्णपणे ओरसलेलं नसलं तरी आता निर्बंध उठवण्यात आले आहेत आणि त्याचा फायदा उचलण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल २०२२ भारतातच खेळवण्यासाठी कंबर कसली. महाराष्ट्र सरकारच्या मदतीने बीसीसीआय आयपीएलचे सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यात खेळवत आहेत. निर्बंध हटले, स्टेडियममध्ये प्रेक्षक परतले पण, २२ सामने होऊनही अद्याप अपेक्षित प्रतिसाद मात्र मिळताना दिसत नाही. टीव्ही रेटिंगमध्ये आयपीएलची प्रेक्षकसंख्या ३३ टक्क्यांनी घसरल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. त्याचा जाहीरातींवर विपरित परिणाम होण्याची भीती बीसीसीआयला वाटतेय.

प्रेक्षकांच्या लहरीपणाचा अंदाज ओळखण्यात त्यांची चूक झाली असावी अशी शक्यताही यातून दिसतेय. २०२१ला बीसीसीआयने आयपीएल भारतात खेळवण्याचे केलेले धाडस त्यांच्या अंगलट आले आणि परिणामी बायो बबल फुटला व त्यांना गाशा गुंडाळून पुन्हा संयुक्त अरब अमिरातीचा 'सहारा' घ्यावा लागला. यावेळी कडक नियमावली तयार करून बीसीसीआय आयपीएल खेळवत आहेत. इतक्या वर्षांनी भारतात होणाऱ्या आयपीएलला चांगला प्रतिसाद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. पण, लॉकडाऊन उठले आणि लोक आपापल्या कामाला लागले, याचा विसर बीसीसीआयला पडला. २०२०-२१ मध्ये लोकं घरी असल्यामुळे आयपीएल यूएईत होऊनही त्याला चांगली व्ह्यूअर्सशीप मिळाली होती. लॉकडाऊनमुळे त्यांच्याकडे बराच फावला वेळही होता आणि त्यामुळेच टीव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलने रिकॉर्डतोड व्ह्यूअर्सशीप मिळवली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी स्वतः ही आनंदाची बातमी शेअर केली. सध्या बीसीसीआय आयपीएल २०२२ची दर्शकसंख्या का रोडावली याचा अभ्यास करण्यात मग्न झाली आहे. लॉकडाऊननंतर या दोन वर्षांत लोकांना बरंच काही शिकवलं. फावल्यावेळात त्यांनी क्रिकेटचा आनंद लुटला खरा, पण त्याने पोट भरत नाही, याची जाण याच काळात लोकांना झाली. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्यासाठी आयपीएल चैनीचे साधन आहे. पण, जे डायहार्ट क्रिकेट चाहते आहेत, परंतु त्यांना खिसा सांभाळून छंद जोपासण्याची शिकवण या लॉकडाऊनमध्ये मिळाली. त्यामुळे  स्टेडियमवरील प्रेक्षकसंख्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवूनही फॅनबेस फ्रँचायझींचे सामने सोडल्यास प्रत्यक्ष मॅच पाहायला येणारा प्रेक्षकही कमी झालाय.

मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच महेंद्रसिंग धोनी विरुद्ध विराट कोहली या सामन्याला मोठ्या संख्येने प्रेक्षक आले होते. आतापर्यंत झालेल्या २२ सामन्यांमध्ये टीव्ही रेटिंग आणि हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रेक्षकसंख्या या सामन्याला मिळाली. प्रेक्षकसंख्या कमी होण्याची काही कारणं... पहिलं प्रमुख कारण म्हणजे लॉकडाऊन हटणे... निर्बंध हटल्यानंतर आता सारेच जण त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याच्या मागे लागले आहेत. ऑफिसेस पुन्हा सुरू झाली आहेत. खरं तर लॉकडाऊन हे बीसीसीआयला आर्थिक कमाई करण्यासाठी फायद्याचे ठरले, परंतु त्याचा आता इतका उलटा परिणाम होईल, याची अपेक्षा बीसीसीआयनेही केली नसावी... आयपीएल हे युवा खेळाडूंना व्यासपीठ देते, हे खरे असले तरी प्रेक्षकांना खेचून आणणारे खेळाडू फार कमी आहेत. यंदाच्या आयपीएलपूर्वी एबी डिव्हिलियर्सने निवृत्ती जाहीर केली. आयपीएलमधील सर्वात मोठा क्राऊडपूलर (प्रेक्षक खेचणारा) खेळाडू हा एबी होता. त्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल हाही खेळत नसल्याने आयपीएलची रयाच गेली आहे. त्यात सुरेश रैना हा मि. आयपीएल म्हणून ओळखला जातो, त्यालाही डच्चू दिला गेला. त्यामुळे फक्त चेन्नई सुपर किंग्सचेच फॅन्स नव्हे, तर त्याच्याशी जोडलेला प्रत्येक चाहता हा दुखावला गेलाय. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सलाही ट्रोल केले गेला आणि त्याचा परिणामही टीआरपीवर झालाय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तगडे संघच सुरुवातीला ढेपाळले. या दोन फ्रँचायझींना मोठा फॅनबेस आहे आणि त्यांची कामगिरी निराशाजनक झाल्याने तो दूरावत चाललाय. रोहित शर्मा, लोकेश राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, विराट कोहली आदी स्टारही काही कमाल दाखवू शकलेले नाहीत. दोन नवीन संघ दाखल झाल्यामुळे प्रस्थापित संघांची घडी विस्कटलेली पाहायला मिळाली. त्यामुळे एका विशिष्ट खेळाडूमुळे फ्रँचायझीशी जोडलेला चाहताही दुरावला. चेन्नईच्या बाबतीत जे रैनामुळे घडले, ते मुंबई इंडियन्सच्या बाबतीत पांड्या बंधूमुळे घडताना दिसतेय. बंगळुरूने युझवेंद्र चहलला पुन्हा न घेणे, हेही अनेकांना पटलेले नाही.  

प्रेक्षक पुन्हा येतील?
आज युवा खेळाडू भारताकडून खेळण्याआधी आयपीएल खेळण्याचे स्वप्न पाहत आहेत. आयपीएलचा तिसरा आठवडा संपलाय आणि अजून सहा आठवडे ही स्पर्धा रंगणार आहे. त्यामुळे बीसीसीआय चाहत्यांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यात किती यशस्वी होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 

Web Title: Overabundance of cricket and Missed tactics, column about IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.