आदर्श लग्नाचा गुजर पॅटर्न
By यदू जोशी | Updated: June 8, 2025 10:48 IST2025-06-08T10:48:02+5:302025-06-08T10:48:23+5:30
Marriage: धुळे, नंदुरबार, जळगाव आणि बाजूच्या गुजरात अन् मध्य प्रदेशच्या एकेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला गुजर समाज हा लग्नसमारंभ आदर्श कसा असला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रामुख्याने कृषी व्यवसाय करणार्या या समाजात लग्नांमध्ये उधळपट्टीला पूर्णत: चाप लावण्यात आलेला आहे. हे एवढ्यातले नाही तर गेली चार दशके हा पॅटर्न या समाजाने स्वीकारला आहे.

आदर्श लग्नाचा गुजर पॅटर्न
- यदु जोशी
(सहयाेगी संपादक)
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि बाजूच्या गुजरात अन् मध्य प्रदेशच्या एकेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असलेला गुजर समाज हा लग्नसमारंभ आदर्श कसा असला पाहिजे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. प्रामुख्याने कृषी व्यवसाय करणार्या या समाजात लग्नांमध्ये उधळपट्टीला पूर्णत: चाप लावण्यात आलेला आहे. हे एवढ्यातले नाही तर गेली चार दशके हा पॅटर्न या समाजाने स्वीकारला आहे. १९८० च्या दशकात या समाजाचे थोर नेते पी. के. अण्णा पाटील यांनी आपल्या समााजातील लग्नांमध्ये वारेमाप खर्च करण्याला आवर घालण्याचे ठरविले कारण त्यावेळी हुंड्यापायी मुलींचे बाप अक्षरश: मेटाकुटीला आलेले होते. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे समाजाच्या बैठकीत त्या संबंधीची आचारसंहिता पी. के. अण्णांनी ठरवून दिली. त्यानुसार आजही समाज चालतो आहे. पी. के. अण्णा हे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांचे निकटवर्ती होते, तीनवेळा आमदार राहिले आणि एसटी महामंडळाचे अध्यक्षही होते.
गुजर समाजाने आणखी एक वैशिष्ट्य जपले आहे, ते म्हणजे मुलाकडचे आणि मुलीकडचेही लग्नाच्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी त्यांच्या ऐपतीनुसार रोख देणग्या देतात. या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपली जाते. हुंड्याबाबत एक शब्दही कोणी तोंडून काढत नाही, काढू शकत नाही. जर कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्या बाबत काही बोललाच तर त्याला लगेच हटकून चूप केले जाते. हुंडा या समाजाने केव्हाच हद्दपार केला आहे. तसा प्रयत्न कोणी केलाच तर त्या कुटुंबाला बहिष्कृत करण्याची भूमिका घेतली जाते आणि नंतर त्या कुटुंबाशी सोयरिक न करण्याची भूमिका घेतली जाते.
मुलामुलींमध्ये कोणताही भेद न करता मुली या मुलांच्या बरोबरीने शिकल्याच पाहिजेत हा विचार गुजर समाजाने अमलात आणला आहे. परिणामत: आज मुली या मुलांपेक्षा अधिक शिकत्या होत आहेत. मुलींच्या शिक्षणाची मोठी चळवळ कोणताही गवगवा न करता या समाजाने अव्याहत सुरू ठेवली आहे, प्रत्येकजण स्वत:पासून त्याची सुरुवात करतो. वैशाली हगवणे प्रकरणाने हुंड्यासाठी नवविवाहितांचा होणारा छळ या विषय ऐरणीवर आलेला असताना गुजर समाजाचा लग्नविषयक आदर्श सर्वांनीच स्वीकारण्याची गरज आहे.
डीजेचा दणदणाट, वरवधूला उचलून घेत केले जाणारे उथळपणाचे प्रदर्शन, नाचण्यागाण्यातील हिडीसपणा असे काहीही या समाजाच्या लग्नात बघायला मिळत नाही, त्यामुळे समारंभाचे पावित्र्य नेत्रसुखद असते.
बहुतेक समाजांमध्ये चारपाच तास चालणारे बुफे किंवा जेवणाच्या पंक्ती, आठ-दहा प्रकारच्या मिठाया, पाचसात भाज्या, चपात्यांचे पाचसात प्रकार, स्टार्टर्सचे वेगळे स्टॉल असा सगळा घमघमाट दिसतो.
श्रीमंतीचे प्रदर्शन केले जाते. अमुकाच्या लग्नात होता त्यापेक्षा अधिकचा थाट माझ्याकडे असलाच पाहिजे अशी स्पर्धा लागते. बुफेंमध्ये अन्नाची नासाडी होताना आपण नेहमीच बघतो.
गुजर समाजात किती साधे, सुटसुटीत आहे बघा, सकाळी लग्न लागले की फक्त दोनच पंक्ती बसतात. एकात लग्नाला आलेले पुरुष जेवायला बसतात, दुसरी पंगत फक्त महिलांची बसते.
दुपारी एकदीडला मंगल कार्यालय बंद केले जाते. २ वाजता तुम्ही गेलात तर तिथे लग्न होतं की नाही हेही कळणार नाही. जेवणात पदार्थांची रेलचेल वगैरे काहीच नसते. फक्त एकच मिठाई असते.