"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:22 IST2025-12-09T11:21:51+5:302025-12-09T11:22:35+5:30
आम्ही पहिल्यापासून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने काम करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायम वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं.

"वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक
नागपूर - राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वेगळा विदर्भ मुद्द्यावरून काँग्रेसनेभाजपाला खिंडीत पकडल्यानंतर त्यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वेगळा विदर्भ काँग्रेसचा अजेंडा नसून तो भाजपाचा अजेंडा आहे आम्ही त्यावर काम करतोय असं विधान केले आहे. बावनकुळे यांच्या या विधानावरून नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, वेगळा विदर्भ हा काँग्रेसचा अजेंडा कधीच नव्हता. मात्र आता घाबरून जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा यासाठी काँग्रेस वेगळा विदर्भाचा मुद्दा काढत आहे. परंतु हा मुद्दा भाजपाचा आहे. वेगळा विदर्भ भाजपाचा अजेंडा आहे. या अजेंड्यावर आम्ही काम करत आहे. हा मुद्दा भाजपाच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही. आम्ही पहिल्यापासून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने काम करतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायम वेगळ्या विदर्भाच्या बाजूने भूमिका ठेवली आहे. कुठल्याही परिस्थितीत भाजपाची भूमिका वेगळ्या विदर्भाचीच आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
तर वेगळ्या विदर्भाच्या मागणीला समर्थनाचा विषय नाही. आमची स्पष्ट भूमिका विदर्भाचा अनुशेष भरून काढला पाहिजे. विदर्भाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याशिवाय अनेक मंत्री विदर्भातील आहेत. या मंत्र्यांचेही विदर्भाकडे लक्ष असते. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विदर्भाचा विकास कसा होईल हे बघितले पाहिजे. वेगळ्या मराठवाड्याचीही मागणी झाली होती. मात्र राज्य वेगळे करून विकास होत नाही हे आम्ही त्यांना समजून सांगितले. सर्वांनी मिळून महाराष्ट्र प्रगत बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं सांगत शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपाच्या मागणीला विरोध केला.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले होते?
राज्याच्या सत्तेत मराठा समाजाचे नेहमीच प्राबल्य राहिले आहे. विदर्भात दलित, आदिवासी व ओबीसींची संख्या मोठी आहे. त्यामुळे या समाज घटकांना न्याय द्यायचा असेल तर सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून वेगळे विदर्भ राज्य आवश्यक आहे. अधिवेशनानंतर आपण काही आमदारांना सोबत घेऊन दिल्लीत काँग्रेस हायकमांडची भेट घेऊ. त्यांना याचे महत्त्व समजावून सांगू आणि वेगळ्या विदर्भासाठी मोहीम सुरू करू, असे काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले होते.