आणखी तीन दिवस राहणार ‘ताप’दायक वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 05:08 IST2019-05-31T05:07:58+5:302019-05-31T05:08:18+5:30

मुंबईसह महाराष्ट्रात या वेळी मान्सूनपूर्व पावसाची बरसात होते. मात्र यंदा राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली आहे. एप्रिलच्या मध्यंतरी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या

Will remain for three more days 'feverish atmosphere' | आणखी तीन दिवस राहणार ‘ताप’दायक वातावरण

आणखी तीन दिवस राहणार ‘ताप’दायक वातावरण

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम आहे. मुख्यत: विदर्भात अनेक दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या हवामानात काहीच बदल नोंदविण्यात येणार नसल्याची चिन्हे आहेत. परिणामी मराठवाडा आणि विदर्भातील हवामान तापदायकच राहणार असून, २ जूनपर्यंत हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. चंद्रपूरचे गुरुवारचे कमाल तापमान ४६.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, हे राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४.३ अंश नोंदविण्यात आले असून, ‘ताप’दायक ऊन आणि आर्द्रता मुंबईकरांना घाम फोडत आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात या वेळी मान्सूनपूर्व पावसाची बरसात होते. मात्र यंदा राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली आहे. एप्रिलच्या मध्यंतरी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, आणखी एक आठवडा कुठेही पावसाची शक्यता नसली तरी किनारी जिल्ह्यांमध्ये डहाणू ते गोवा या भागांमध्ये प्रामुख्याने मुंबई, रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये तुरळक सरींची शक्यता आहे. हा पाऊस अत्यंत कमी असून आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परिणामी तापमानात फारसा फरक पडणार नाही. विदर्भ, मराठवाड्याचा काही भाग आणि मध्य महाराष्ट्रच्या काही भागांमध्ये कमीत कमी एक आठवडाभर तीव्र उष्णतेच्या लाटेची परिस्थिती राहील.

उष्णतेच्या लाटेचे कारण
वायव्येकडून सिंध आणि बलुचिस्तानकडून राजस्थानमार्गे महाराष्ट्रापर्यंत येणारे उष्ण आणि कोरडे वारे; हे उष्णतेच्या लाटेचे प्रमुख कारण आहे.

दिल्लीही तापली
उत्तर भारतातही उष्णतेने कहर केला आहे. तेथील कमाल तापमान ४५ अंशांवर दाखल झाले आहे. राजधानी दिल्लीही तापली असून, कमाल तापमान ४५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे.

राज्य ३० अंशांवर
नागपूर, चंद्रपूर, अकोला, वर्धा, औरंगाबाद, जालना, नांदेड, लातूर आणि मालेगाव येथे कमाल तापमान अधिक राहील. येथे किमान तापमानही ३० अंश राहील.

Web Title: Will remain for three more days 'feverish atmosphere'