“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 20:37 IST2025-06-26T20:34:40+5:302025-06-26T20:37:11+5:30
Sharad Pawar Reaction On Shaktipeeth Mahamarg: हा प्रकल्प काय आहे? त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
Sharad Pawar Reaction On Shaktipeeth Mahamarg: नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यातच आता कोल्हापूरसह अनेक ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. नेतेही याला तीव्रपणे विरोध दर्शवत आहेत. यातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत एक सूचक विधान केले आहे.
शक्तिपीठ महामार्गाबाबत काही आक्षेप असतील, तर चर्चेतून सोडवू. परंतु, राजकारणासाठी विरोध केला तर याद राखा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या शरद पवार यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच मंत्रिमंडळातील काही मंत्री शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात आहेत, असेही सांगितले. यावेळी शरद पवार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही
देवेंद्र फडणवीसच्या धमकीमुळे आमची झोप उडाली आहे. आता आमचे कसे व्हायचे, असा खोचक टोला लगावताना, शक्तिपीठ महामार्गाचा विषय मला समजून घ्यायचा आहे. कोल्हापूरच्या लोकांबरोबर बोलणार आहे. त्यानंतर राज्य सरकारने आम्हा लोकांना त्याची माहिती देण्याची तयारी दाखवली तर तेही समजून घेण्याचा माझा विचार आहे. हा प्रकल्प काय आहे? हे आधी मी समजून घेईन. त्याची आवश्यकता आहे का? ते समजून घेईन. त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात, त्यांची मते जाणून घेईन. त्या भागातील लोकप्रतिनिधी जे जाहीर बोलत आहेत, त्यांचा आग्रह समजून घ्यावा लागेल. मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकल्पासाठी ८६,३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. सध्या कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ३०९ गावांत मोजणी सुरू आहे. ऑगस्टपर्यंत मोजणी पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गामुळे वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधदुर्ग हे १२ जिल्हे जोडले जातील.