Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मराठा समाज मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही. अनेकवेळा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे आता चर्चेला संधी नसून, २९ ऑगस्टला मराठा समाज सरसकट ओबीसीतून आरक्षणच घेणार असल्याचे मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मोर्चावरून अनेक तर्क-वितर्क सुरू आहेत. तसेच राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या आहेत.
आम्ही आमच्या लेकरांसाठी आरक्षण मागतोय. २७ तारखेला मराठे मुंबईकडे निघणार आहेत. २९ रोजी मुंबईत समुद्रासारखी ताकद दाखवू. आमच्या लेकराला काठी लागली तर महाराष्ट्रातील सगळे रस्ते बंद पडतील, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चावर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीकाही करताना पाहायला मिळत आहे. परंतु, यावेळी मनोज जरांगे पाटील खरेच मुंबई गाठणार की, मागच्या वेळेसारखे ऐनवेळी माघार घेऊन गावी निघून जाणार, असा प्रश्न चर्चिला जात असल्याचे सांगितले जात आहे.
पाटील, आता तरी मुंबई गाठणार का?
मराठा आरक्षणासाठीमनोज जरांगे-पाटील हे २७ ऑगस्टला समर्थकांसह मुंबईकडे कूच करणार आहेत. २८ ऑगस्टला सायंकाळी ते नवी मुंबईत दाखल होतील. त्यांच्यासोबत लाखो आंदोलक असल्याने पालिका, पोलिसांची पुन्हा कसोटी लागणार हे नक्की. पण, गेल्या वर्षी त्यांनी अशाच आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईकडे कुच केली खरी पण, ऐनवेळी माघार घेत वाशीतून पुन्हा गाव गाठले होते. हे त्यांच्या समर्थकांच्या स्मरणात हे असेल. सरकारने त्यांना गंडवल्याची प्रतिक्रिया उमटली होती. त्यामुळे यावेळी तरी ते मुंबई गाठणार का, असा प्रश्न उपस्थित झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, सरकार दंगल घडवून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊच देणार नाही. मुंबईत पण जाणार आहे. अतिशय शांततेत तेथे जाणार आहोत. आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा अधिकार आहे. आता मराठे खवळून उठले. सरकारने मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला; पण समाज सोबत असल्याने मी भीत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मराठ्यांची पोरं आता थांबणार नाहीत. आरक्षण घेतल्याशिवाय कुणाचेही ऐकणार नाहीत, अशी मनःस्थिती समाजाची आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली होती.