''मराठा आंदोलकांवरचे पाच वर्षांतील अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जाणार?''

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 20:30 IST2019-12-04T20:13:56+5:302019-12-04T20:30:33+5:30

मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे

"Will the five years of unjust crimes against Maratha agitators be withdrawn?" | ''मराठा आंदोलकांवरचे पाच वर्षांतील अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जाणार?''

''मराठा आंदोलकांवरचे पाच वर्षांतील अन्यायकारक गुन्हे मागे घेतले जाणार?''

मुंबईः आरे आणि नाणार प्रकरणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांकडे तशी मागणी पत्राद्वारे केली आहे. त्यानंतर आज सह्याद्रीवर कॅबिनेटची बैठक घेण्यात आली, चार तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा करण्यात आली आहे.
  
मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली असून, मराठा आंदोलकांच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं. निरपराध लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. राज्याच्या हितासाठी जे जे काही करावं लागेल, ते करण्याचा निर्णय आणि चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली आहे. कुठला माणूस आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे कधीही पाहिलं जाणार नाही. नवीन सरकार आहे, नवीन मुख्यमंत्री आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता प्राथमिकता कुठल्या प्रकल्पाला दिली पाहिजे, हे ठरवणं राज्य सरकारचं काम आहे. राज्याच्या हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतले जातील. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आहे. कर्जाचा विषय आहे. याबाबतीत सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत आरे आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेतलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजातील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. आरे आणि नाणारप्रमाणेच भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरचे गुन्हेही मागे घ्यावेत, अशी मागणी आता सुरू झाली आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मागणी केली.
 

Web Title: "Will the five years of unjust crimes against Maratha agitators be withdrawn?"