IND vs PAK: भाजपची देशभक्ती फक्त...; भारत-पाक सामन्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 12:43 IST2026-02-15T12:41:37+5:302026-02-15T12:43:31+5:30
Sanjay Raut On India vs Pakistan: खासदार संजय राऊत यांनी भारत-पाक सामन्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यातून मिळणारा शेकडो कोटींचा पैसा दहशतवादासाठी वापरला जात असून, भाजपचा देशभक्ती केवळ निवडणुकांपुरतीच आहे का? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे.

IND vs PAK: भाजपची देशभक्ती फक्त...; भारत-पाक सामन्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण तापले असून, उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. "मालेगावच्या दालनातील टिपू सुलतानाचा फोटो काढणारे देवेंद्र फडणवीस, टिपू सुलतानला 'नायक' मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळताना गप्प का?" असा टोकदार सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानला नायक मानले जाते. तिथल्या अभ्यासक्रमात त्याचे धडे आहेत. जर भाजपला टिपू सुलतानाचा एवढाच तिटकारा आहे, तर त्याला आदर्श मानणाऱ्या देशासोबत भारत क्रिकेट का खेळत आहे? यावरून भाजपची देशभक्ती किती पोकळ आणि ढोंगी आहे, हे उघड झाले आहे."
राऊत यांनी यावेळी गंभीर आरोप करत सामन्यातून मिळणाऱ्या पैशांवरून भाजपला घेरले. "भारत-पाकिस्तान सामन्यावर हजारो कोटींचा जुगार खेळला जातो. या बेटिंगमधून मिळणारा पैसा पाकिस्तानला जातो आणि तोच पैसा पुलवामा किंवा पहलगामसारख्या दहशतवादी हल्ल्यांसाठी वापरला जातो. हा पैसा मिळवण्यात सरकारचाही वाटा असतो आणि हे पाप भाजपचे आहे," अशी जळजळीत टीका त्यांनी केली.
काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केल्याबद्दल विचारले असता, राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. "टिपू सुलतान आणि महाराजांची तुलना होऊच शकत नाही. त्याबाबत आम्ही काँग्रेसशी चर्चा करू, पण सध्याचा खरा प्रश्न हा आहे की, पाकिस्तानशी क्रिकेट संबंध का तोडले जात नाहीत?" असे सांगत त्यांनी पुन्हा भाजपवर निशाणा साधला.