"वाल्मिक कराडला अजून अटक का होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?’’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 19:26 IST2024-12-29T19:25:30+5:302024-12-29T19:26:01+5:30
Vijay Wadettiwar News: हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

"वाल्मिक कराडला अजून अटक का होत नाही, तो सरकारचा जावई आहे का?’’ विजय वडेट्टीवार यांचा सवाल
मुंबई - सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून इतका मोठा मोर्चा निघाला पण त्यानंतर देखील सरकार जागे झाले नाही. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी म्हणून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळणार नाही, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अजून अटक होत नाही. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सूत्रधाराला अटक करू, आरोपींवर मकोका लावू अश्या मोठ्या घोषणा केल्या पण अजून अटक का होत नाही? वाल्मिक कराड हा सरकारचा जावई आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रात बीड मध्ये बिहारसारखी परिस्थिती झाली आहे. अनेक जमिनी लुटल्या, खंडणी मागितली जातात, महिलांवर अत्याचार होतात. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखे प्रकरण होऊन पोलीस वाल्मिक कराडला अटक का करू शकत नाही? परभणीमध्ये भीमसैनिकांवर कारवाई करताना पोलिसांना धार येते मग बीडमध्ये पोलिसांना लकवा मारला आहे का, प्रश्न विचारत विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांवर टीका केली.
संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाला, त्यांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाही का? याचा सूत्रधार वाल्मिक कराडची नार्को टेस्ट झाली पाहिजे.आतापर्यंत बीड मध्ये झालेल्या हत्या, खंडणी, महिला अत्याचार सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.