गुवाहाटीच्या दौऱ्याला काही आमदार गैरहजर का आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 15:05 IST2022-11-26T15:03:48+5:302022-11-26T15:05:47+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहेत.

गुवाहाटीच्या दौऱ्याला काही आमदार गैरहजर का आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टचं सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले आहेत. पण मंत्री गुलाबराव पाटील आणि सांगलीतील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर गुवाहाटीला गेलेले नाहीत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्यामुळे या दोन्ही नेत्यांनी गुवाहाटी दौऱ्याला पाठ फिरवल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांवर टीका केली.
"पुन्हा एकदा आमच स्वागत गुवाहाटीतील लोकांनी आमचे स्वागत केले, याच आम्हाला आनंद आहे. आसामचे तीन मंत्री आमच्या स्वागतासाठी आले आहेत. तीन महिन्यांपूर्वी आमची धावपल होती, त्यामुळे आता आम्ही पुन्हा देवीच्या दर्शनाला आलो आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
"काही आमदार गुवाहाटीला आलेले नाहीत, त्या आमदारांनी माझी परवानगी घेतली आहे. त्या आमदारांच्या मतदारसंघात निवडणुका आहेत म्हणून ते गुवाहाटीला आलेले नाही. त्यामुळे विरोधक आमच्यावर काय टीका करतात त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही, त्यांना काही काम नाही म्हणून ते टीका करत आहेत, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मी नाराज नाही: आमदार अनिल बाबर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या समर्थक मंत्री, आमदार, खासदारांसोबत आज, शनिवारी सकाळी विशेष विमानाने गुवाहाटीला रवाना झाले. मात्र सांगलीतील खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर गुवाहाटीला गेले नाहीत. यामुळे बाबर नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यावर आमदार बाबर यांनी स्पष्टीकरण दिले.
शिंदे गटातील आणखी एका आमदाराची गुवाहाटीला जाण्यास गैरहजेरी, म्हणाले..
आमदार बाबर म्हणाले की, सरकार स्थापनेच्या घडामोडीवेळी माझी पत्नी आजारी पडली. तिचे त्या आजारपणात निधन झाले. आता २७ नोव्हेंबररोजी तिचा जन्मदिवस असून, आमच्या घरी घरगुती कार्यक्रम आहे. अशा परिस्थितीत भावनेचा प्रश्न निर्माण होतो. यामुळेच मी हा दौरा रद्द केला. या दौऱ्याला मी गेलो नाही, याचा अर्थ असा होत नाही की, मी नाराज आहे. मी राजकारणात अनेक वर्ष काम करत आहे. राजकीय परिस्थितीत कोठे जायला मिळाले अगर न मिळाले यापेक्षा समाजकारणाला महत्व देणारा मी माणूस आहे.