वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:00 IST2025-01-28T19:59:17+5:302025-01-28T20:00:47+5:30
Walmik Karad : खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मीक कराड याच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

वाल्मीक कराडच्या अडचणी आणखी वाढणार, ईडीकडून स्वतंत्र चौकशीची मागणी; नेमकं कारण काय?
Walmik Karad ( Marathi News ) : पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे. कराड आता न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मीक कराड याच्या संपत्तीबाबतही गेल्या काही दिवसापासून खुलासा होत आहे. पुण्यात करोडो रुपयांच्या फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची ईडीकडून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी सुरू आहे.
विमान उड्डाण करणार होते, अचानक प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला; प्रवाशांमध्ये खळबळ उडाली
वाल्मीक कराड याची ईडीकडून स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका आरटीआय कार्यकर्ते अमेय तिरोडकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. गेल्या काही दिवसापासून बीड प्रकरणात कॅबिनेट मंत्र्यांचे नाव समोर येत असल्याने पोलीस तपासाला मर्यादा येत असल्याचे या याचिकेत म्हटले आहे.
नेमकं कारण काय?
गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तर दुसरीकडे पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणीही चौकशी सुरू आहे. या दोन्ही प्रकरणांची चौकशी एसआयटी आणि सीआयडी करत आहेत. पण, मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव सातत्याने येत असल्याने पोलीस तपासाला मर्यादा येत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. म्हणून ईडीकडून स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकेत केली आहे.
वाल्मीक कराडचे फोन रेकॉर्डिंग व्हायरल
सध्या सोशल मीडियावर वाल्मीक कराड आणि महिला पोलीस यांच्यातील कॉलवरील हा संवाद व्हायरल झाला आहे. वाल्मीक कराड आणि बीड येथील सायबर सेलच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांचा हा कॉल रेकॉर्डिंग असल्याचा दावा करण्यात येत आहे.
वाल्मीक कराड यांनी बीड जिल्ह्यातील सायबर सेलला कॉल केला आहे. यामध्ये समोरून महिला पोलीस अधिकारी बोलत असल्याचे दिसत आहे. व्लामीक कराड सांगत आहेत की,'ताई व्लामीक कराड बोलतो. ते पोर करत आहेत, भैय्या पोस्ट डिलिट करा. त्यांनी आधी सुरुवात केली. आम्ही शांत होतो. इग्नोर करायचं भैय्या, एवढं कशाला मनावर घ्यायच. इथं आम्ही बाप बसलो आहे. मी असल्यावर काय चिंता', असं वाल्मीक कराड बोलत असल्याचे दिसत आहे.