Uddhav Thackeray : "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:39 IST2023-11-28T14:26:23+5:302023-11-28T14:39:41+5:30
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Uddhav Thackeray : "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?"
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य वाऱ्यावर पडलंय. एक फुल दोन हाफ. दुसरे दोन हाफ कुठेत, कल्पना नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे, मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार?" असा सवालही विचारला आहे.
"दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःचं घर, स्वतःचं राज्य का नाही सांभाळत?, भाजपा इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा! आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय! तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धूर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा! मी शिवसैनिकांना आवाहन करतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांना दिलासा द्या!" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे । मातोश्री - #LIVEhttps://t.co/PwcEgxhRje
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) November 28, 2023
"असंविधानिक मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून, दुसऱ्याची घरं धुंडाळतायत. स्वतःच घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत! मुख्यमंत्र्यांच्या पंचतारांकीत शेती माझ्या गरीब शेतकऱ्याला ही मिळो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामलल्लाच्या दर्शनापेक्षा तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार? महाराष्ट्रात निवडणुका आल्यावर जर तुमच्या तिजोरीची दारं उघडणार असतील, तर तोपर्यंत महाराष्ट्राची जबाबदारी कोण घेणार?"
"ज्यांची कोणावर निष्ठा नाही ते वस्तुनिष्ठ माहिती काय घेणार? आताचं घटनाबाह्य सरकार म्हणजे, दुष्काळातला तेरावा महिना! बळीराजा गारपीट, अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस बेपर्वाईने प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे.