रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभाग देणार ९ कोटी रुपये; राज्यभरात महिनाभर राबवणार जनजागृतीपर उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 12:59 IST2026-02-25T12:58:28+5:302026-02-25T12:59:29+5:30
अभियानासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्यातील ६० प्रादेशिक परिवहन कार्यालयांना प्रत्येकी १५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभाग देणार ९ कोटी रुपये; राज्यभरात महिनाभर राबवणार जनजागृतीपर उपक्रम
मुंबई : राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने व्यापक जनजागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्यातील ६० प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) प्रत्येकी १५ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
या निधीच्या माध्यमातून प्रत्येक आरटीओ आपल्या कार्यक्षेत्रात महिनाभर विविध जनजागृती उपक्रम राबवत आहे. यावर्षी १ ते ३१ जानेवारीदरम्यान अभियान राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, काही ठिकाणी उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने कार्यक्रम अद्यापही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार अभियान
राज्यातील वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेत केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने राज्यांना विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वाहनांवरील करातून जमा होणाऱ्या निधीचा काही भाग रस्ता सुरक्षा योजनेंतर्गत प्रसिद्धी व जनजागृतीसाठी वापरण्याचे निर्देश देण्यात आले. दरवर्षी ७ ते ३० दिवसांच्या कालावधीत हे अभियान राबवले जाते. प्रत्येक उपक्रमासाठी २५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंत निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन आरटीओ अधिकाऱ्यांना उपक्रमांचे नियोजन करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
अशी करणार जनजागृती
रस्ता सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे वाहतूक नियमांचे पालन, वेगमर्यादा पाळणे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर अनिवार्य करणे याबाबत जनतेत जागरूकता निर्माण करणे.
विशेषतः तरुणांमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असल्याने विद्यार्थ्यांवर केंद्रित कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे.
परिवहन विभागाच्या या उपक्रमामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊन सुरक्षित वाहतुकीकडे राज्याची वाटचाल होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
अभियानांतर्गत नेमके कोणते उपक्रम राबविण्यात येणार ?
दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट वापर अनिवार्यतेबाबत बाईक रॅलीचे आयोजन
शाळा व महाविद्यालयांमध्ये रस्ता सुरक्षाविषयक व्याख्याने व कार्यशाळा
विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमावलींची पुस्तिका वितरण
चौक, सिग्नल आणि गर्दीच्या ठिकाणी जनजागृती फलक व बॅनर लावणे
सोशल मीडियाच्या माध्यमातून माहितीपर व्हिडीओ व संदेश प्रसारित करणे
रेडिओ व वृत्तपत्रांद्वारे जाहिराती प्रसिद्ध करून त्याद्वारे जनजागृती करणे