Palghar: गावासाठी अद्याप रस्ता नाही; उपचाराअभावी जव्हार तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 10:41 IST2026-02-05T10:40:19+5:302026-02-05T10:41:17+5:30
जव्हार तालुक्यात गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुधवारी पहाटे डोलीत रुग्णालयाकडे नेण्यात येत असताना रस्त्यांच्या अभावामुळे मृत्यू पावला. ग्रामस्थांनी वेळेवर वैद्यकीय मदत मिळू न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला.

Palghar: गावासाठी अद्याप रस्ता नाही; उपचाराअभावी जव्हार तालुक्यातील तरुणाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार: जव्हार तालुक्यातील नागरी सुविधांचा प्रश्न चर्चेत असतानाच तिलोंडा (आंबेपाडा) येथील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या तरुणाचा रस्त्यांअभावी वेळीच उपचार न मिळाल्याने बुधवारी पहाटे मृत्यू झाला. शैलेश मगन वागदडा असे (वय १८) असे त्याचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शैलेश याला रात्री अस्वस्थ वाटत असल्याने तिलोंडा गावातून जव्हार येथील कुटिर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला पण, गावातून चार किमी अंतरावरील आंबेपाडापर्यंत चांगला रस्त्या नसल्याने ग्रामस्थांवर त्याला डोलीतून दवाखान्याकडे नेण्याची वेळ आली. मात्र, अर्ध्या रस्त्यातच त्याची वेळीच उपचार न मिळाल्याने प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
पावसाळ्यात जगणे कठीण
तिलोंडा (आंबेपाडा) हे आदिवासीबहुल गाव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात या गावाचा संपर्क पूर्णतः तुटतो. रुग्णवाहिका किंवा चारचाकी वाहन गावात पोहोचू शकत नसल्याने रुग्णांना खडतर डोंगरवाटांवरून डोलीनेच हलवावे लागते. शैलेशच्या बाबतीतही हेच घडले. प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर दवाखान्यात पोहोचणे शक्य न झाल्याने त्याचा मृत्यू झाला, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.