अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर दोनदा टोल! पहिल्या टप्प्यात खारपाडा, खांब नाक्यावर खिसा खाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 07:53 IST2026-03-08T07:53:09+5:302026-03-08T07:53:43+5:30
काम अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना पहिल्या टप्प्यात प्रवाशांना दोनवेळा टोल द्यावा लागेल.

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर दोनदा टोल! पहिल्या टप्प्यात खारपाडा, खांब नाक्यावर खिसा खाली
अलिबाग : काम अपूर्ण असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना पहिल्या टप्प्यात प्रवाशांना दोनवेळा टोल द्यावा लागेल. खारपाडा आणि खांब या टोल नाक्यांवर खिसा खाली करावा लागेल. नागोठणे आणि कोलाड येथील पुलांची कामे वगळली, तर पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील महामार्गाचे काम १५ वर्षांनी अंतिम टप्प्यात आल्यामुळे टोल नाके कार्यान्वित करण्यासाठी प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्याभरात टोल अधिसूचना जारी होण्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या ८४ किमी मार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरण २०११ मध्ये सुरू झाले होते. मात्र कधी निधीची कमतरता, कधी पर्यावरणविषयक परवानगी मिळण्यात आलेल्या अडचणी, कधी भूसंपादनातील अडचणी, तर कधी ठेकेदाराची निष्क्रियता यांसारख्या कारणांमुळे महामार्गाचे काम रखडत गेले. तब्बल १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता हे काम मे अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोलाड, नागोठणे येथील पुलांची कामे सोडली तर बहुतांश कामे पूर्ण
झाली आहेत.
कुठे द्यावा लागणार टोल?
पहिल्या टप्प्यात खारपाडा आणि खांब या दोन ठिकाणी टोल द्यावा लागणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पोलादपूरजवळ लोहारे येथे टोल वसूल केला जाणार आहे. खारपाडा आणि खांब येथील टोल नाक्यांच्या उभारणीच्या कामांना वेग आला आहे. टोल नाक्यांवरील सिग्नल यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. टोल कर्मचाऱ्यांसाठी केबिन्स नव्याने उभारण्यात आल्या आहेत.
टोल किती असेल?
टोल किती असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. येत्या आठवड्यात टोल अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महामार्ग प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे टोल नाके आठवड्याभरात कार्यान्वित केले जाऊ शकतात. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यावर टोल किती असेल, हे स्पष्ट होईल.
रवींद्र इंगुले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पनवेल
गावाकडे जाणारे रस्ते निकृष्ट दर्जाचे
पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यात अनेक गावे येत आहेत. मात्र या गावांना जोडणारे बायपास रस्ते हे मात्र निकृष्ट दर्जाचे ठेवले आहेत. या रस्त्यावर ब्लॉक टाकून रस्ते बनवले आहेत. त्यामुळे गावाकडे जाणारे रस्ते सुस्थितीत कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.